आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानंतर आरक्षणाचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, एसडीओंकडून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी प्राप्त हरकती व आक्षेपांवर २० जून रोजी निर्णय घेऊन २१ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर मतदार यादी व लगेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात २७१ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक लागण्याचे संकेत आहे.
जिल्ह्यातील १ जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २७१ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका लावण्याकरिता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणामुळे यापूर्वी जानेवारीत याच ग्रामपंचायतींमध्ये प्रभागरचनेचा कार्यक्रम लावण्यात आला होता. यामध्ये प्रभागरचना प्रसिद्ध करून आक्षेप आणि हरकती देखील स्वीकारण्यात आल्या होत्या. केवळ सुनावण्या शिल्लक असताना अशातच हा संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतु, न्यायालयाच्या आदेशावरून २७० ग्रामपंचायतींमधील जानेवारीमध्ये रद्द करण्यात आलेला कार्यक्रम कायम ठेवण्यात आला होता. त्यानंतर २७ मे रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. या कार्यक्रमानंतर लगेच २७१ ग्रामपंचायतींमध्ये २९ मे रोजी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
परंतु यात आणखी बदल करीत पुन्हा दुसरा कार्यक्रम आयोगाने घोषित केला आहे. याअंतर्गत ६ ते ७ जूनला विशेष ग्रामसभा बोलावून प्रभाग रचनेच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. ९ जून रोजी आरक्षण सोडत प्रसिद्ध करून ९ ते १३ जून दरम्यान यावर आक्षेप आणि हरकती स्वीकारण्यात आले. १६ जून रोजी हरकतींवर एसडीओंचा अभिप्राय देऊन हा प्रस्ताव आता जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. यावर २० जूनला जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन २१ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.