आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:माई सिंधूताईंचे कार्य पुढे नेण्यासाठी मदतीचा हात‎ ; गरजेच्या वस्तूंचे वितरण‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनाथांची माई पद्मश्री डॉ. सिंधूताई‎ सपकाळ यांचे सामाजिक कार्य पुढे‎ घेऊन जाण्यासाठी पुणे येथील‎ कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड यांनी‎ साथ दिली आहे. माईंच्या चिखलदरा‎ येथील संस्थेत शिक्षण घेणाऱ्या‎ मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व दैनंदिन‎ गरजेच्या वस्तू वाटप केल्या आहे.‎ यासोबत त्यांनी माईंच्या सर्व संस्थांना‎ मदतीचा हात दिला आहे.‎ चिखलदरा येथे १९८० मध्ये सिंधूताई‎ सपकाळ यांच्या सामाजिक कार्याला‎ सुरुवात झाली. दरम्यान त्यांनी वनवासी‎ गोपालकृष्ण बहुद्देशीय मंडळाची‎ स्थापना करून आदिवासी मुलींच्या‎ शिक्षणासाठी पहिले सावित्रीबाई फुले‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह सुरू‎ केले. तेव्हापासून शेकडो मुली या‎ ठिकाणाहून शिक्षण घेऊन बाहेर‎ पडल्या आहेत.

वर्षभरापूर्वी माईंचे‎ निधन झाले आणि त्यांच्या सर्व‎ संस्थेवर दुःखाचा पहाड कोसळला.‎ यातून सावरत असताना माईंचे हे पावन‎ कार्य पुढे सुरू रहावे, या हेतुने माईंच्या‎ सर्व संस्थांना एकत्र करून त्यांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने माई‎ परिवारासोबत कल्याणी टेक्नोफोर्ज‎ लि. पुणे या कंपनीचे व्यवस्थापकीय‎ संचालक रवी नगरकर जोडले गेले.‎ माईंच्या सर्व संस्थांना प्रत्येक महिन्याला‎ नियमित धान्य व किराणा‎ देण्यासाेबतच अनाथ निराधार‎ मुला-मुलींचा शैक्षणिक दर्जा उंचावा‎ यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात गोष्टी‎ पुरवल्या जात आहेत.

यातूनच‎ चिखलदरा येथील सर्व मुलींसाठी‎ स्कुल बॅग, वही, वॉटर बॉटल, स्टडी‎ टेबल, गरम पाण्याची सुविधा, गादी,‎ पाण्याची टाकी, कार्पेट व पंखा,‎ लाइटची सुविधा, स्वयंपाकाची भांडी‎ कंपनीच्या सीएसआर निधीतून‎ हस्तांतरित करण्यात आला. साहित्य‎ वाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी मेळघाट‎ गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष‎ धर्मराजकाका खडके, कल्याणी‎ टेक्नोफोर्ज लि. पुणे सीएसआर‎ विभागाचे प्रमुख राहुल सावंत, रूपेश‎ चौबे, शहापूरचे उपसरपंच बाबू हेकडे,‎ मधू येवले, वनवासी गोपालकृष्ण‎ बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष दीपक‎ गायकवाड, सचिव अरुण सपकाळ,‎ अधीक्षिका सरला गळहाट यांच्यासह‎ संस्थेतील ५० मुली उपस्थित होत्या.‎ माईंनी ३० वर्षांपूर्वी लावलेल्या‎ रोपट्याचा आज वटवृक्ष झाला, अशी‎ भावना बांधकाम सभापती रूपेश चौबे‎ यांनी व्यक्त केली.

आदिवासी मुलींच्या‎ शिक्षणासाठी कुठलीही कमी पडू देणार‎ नाही, आज मुलींना पायी शाळेत जावे‎ लागते पण नजिकच्या काळात‎ सर्वांच्या मदतीने तुम्हाला स्कुल बसची‎ सुविधा उपलब्ध करून दिली जाईल,‎ अशी ग्वाही दीपक गायकवाड यांनी‎ दिली. ‘माईंच्या सर्व संस्थांना लागणारी‎ आवश्यक मदत कल्याणी टेक्नोफोर्ज‎ लि. करत आहे, तुम्ही सर्व मुलींनी‎ गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेऊन‎ आकाशाला गवसणी घातली पाहिजे'',‎ अशी अपेक्षा राहुल सावंत यांनी व्यक्त‎ केली.‎

बातम्या आणखी आहेत...