आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लायब्ररी चौकात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून बुधवारी (दि. १०) उशिरा रात्री साडेबारा वाजता खून झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य मारेकऱ्यासह सहा जणांना अटक केली आहे.
मृत तरुणाने सहा महिन्यांपूर्वी मुख्य मारेकऱ्याच्या लहान भावावर जीवघेणा हल्ला चढवून त्याला जखमी केले होते. त्याच हल्ल्याच्या सुडातून तरुणाचा खून झाला असल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले.
निखिल राजेश तिरथकर (२३, रा. लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा, अमरावती) असे मृताचे तर देवा रामअधार जयस्वाल (२६) असे मुख्य मारेकऱ्याचे नाव आहे. देवा जयस्वालसह विजय किसनलाल मंडले (३९), शक्ति प्रवीण वाघमारे (२७), करण श्याम मंडले (२४), विशाल पवन मंडले (२३) आणि शुभम प्रकाश परिवाले (२४, सर्व रा. फ्रेजरपुरा) या सहा जणांना पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाच्या मदतीने फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरुवारी पहाटेपर्यंत अटक केली.
नक्की घडले काय?
निखिल तिरथकर याने ऑक्टोबर २०२२ मध्ये देवा जयस्वालच्या लहान भावावर चाकूने वार करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यावेळी निखिल तिरथकरविरुद्ध फ्रेजरपुरा पाेलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी पासून देवा जयस्वाल आणि निखिल तिरथकर यांच्यात ‘खुन्नस’ होती.
दरम्यान, बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा परिसरात शक्ति वाघमारेचा त्याच्या घराच्या आजूबाजूने राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. ते भांडण चांगलेच वाढले होते. दरम्यान या वादात निखिल तिरथकरने मध्यस्थी केली होती. तसेच हा वाद झाल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार गाेरखनाथ जाधव यांच्यासह पोलिस ताफा फ्रेजरपुरा चौकात पोहोचला होता.
चाकूने भोसकले
पोलिसांनी भांडण करणाऱ्यांसह जमलेल्या लोकांना घरात पाठवले. त्यावेळी शक्ती आणि निखिल हे सुद्धा आपआपल्या घरात निघून गेले होते. दरम्यान, पोलिस त्याच चौकात हजर असताना सुमारे शंभर ते दीडशे मीटर अंतरावरील एका गल्लीत निखिल तिरथकर गेला असता देवा जयस्वाल, शक्ती वाघमारे व इतर चौघे असे एकूण सहा जणांनी मिळून निखिलला अडवले. त्यावेळी देवा जयस्वालने निखिलच्या दोन्ही मांडीवर चाकूचे घाव केले. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले. त्याचवेळी चौकात उभे असलेल्या पोलिसांना माहिती पडताच पोलिसांनी गल्लीत धाव घेतली तर निखिल तिरथकर हा रक्तबंबाळ स्थितीत पडून होता.
त्याला तत्काळ पोलिस वाहनातून इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरूच असताना काही वेळात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केली असल्याचे फ्रेजरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी सांगितले.
शहरात ५४ तासात खुनाच्या तीन घटना
फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील मासोद गावात सोमवारी सायंकाळी सात वाजता चंद्रशेखर ऊर्फ बाबाराव खंडारे (४५) यांचा खून झाला. त्यानंतर बुधवारी सकाळी बडनेरा हद्दीतील वडुरा जंगलात संजना वानखडे या तरुणीचा तिच्या प्रियकराने गळा चिरुन खून केला आणि बुधवारी रात्रीच बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास निखिल तिरथकर याचा खून झाला. अवघ्या ५४ तासाच्या कालावधीत शहरात तीन खुनाच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
बदल्याच्या भावनेतून खून
यश प्रकरणातील मुख्य मारेकरी देवा जयस्वालच्या लहान भावावर निखिल तिरथकरने सहा महिन्यांपूर्वी प्राणघातक हल्ला केला होता. त्याच हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी देवाने अन्य पाच जणांच्या मदतीने निखीलचा खुन केल्याचे समोर येत आहे. -गोरखनाथ जाधव, ठाणेदार फ्रेजरपुरा, अमरावती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.