आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रजासत्ताक दिनापासून काँग्रेसचे ‘हात से हात जोडो’ अभियान सुरू होत आहे. तब्बल दोन महिने चालणाऱ्या या अभियानाच्या यशस्वीतेसाठी तालुकानिहाय निरीक्षक नेमण्यात आले आहेत. जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीला जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी व निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हात से हात जोडो अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी काँग्रेसने सर्व चौदाही तालुक्यात निरीक्षक नेमले आहेत. या अभियानाचे नेतृत्व माजी पालकमंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप, आमदार बळवंतराव वानखडे करणार आहेत.
या अभियानाच्या प्रचारासाठी जनजागरण रॅलीही काढली जाणार असून बूथनिहाय, वार्डनिहाय कमिटीचे अध्यक्ष व निरीक्षकांच्या माध्यमातून त्यात नागरिकांचा सहभाग वाढविला जाणार आहे. तालुकानिहाय निरीक्षकांमध्ये अचलपूर - प्रकाश काळबांडे, चांदूरबाजार - संजय वानखडे, दर्यापूर - शिवाजीराव बंड, अंजनगाव सुर्जी - संजय लायदे, चिखलदरा - अमोल बोरेकार, धारणी - श्रीकांत गावंडे, मोर्शी - हरिभाऊ मोहोड, वरुड - बाळासाहेब हिंगणीकर, अमरावती - सुरेश आडे, भातकुली - हरेराम मालवीय, तिवसा - भैय्यासाहेब मेटकर, चांदुर रेल्वे - दिलीप काळबांडे, धामणगाव रेल्वे - विक्रम ठाकरे व नांदगाव खंडेश्वर - हरीश मोरे यांचा समावेश आहे.
कांबळे, गजभिये ठेवणार लक्ष
काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे व माजी आमदार किशोर गजभिये हे जिल्ह्यातील घडामोडींवर लक्ष ठेवणार आहेत. या अभियानासाठी त्यांची जिल्हा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. अभियानादरम्यान जिल्हाभर झेंडे लावले जाणार असून पक्षाची ओळख खूण असलेले दुपट्टे, टोपी आणि पत्रके वितरित केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गाव, शहर आणि वार्डात भिंतीही रंगवण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे म्हणणे आहे.
मार्ग लवकरच निश्चित करणार
हात से हात जोडो अभियानासाठी दोन महिन्याचे वेळापत्रकही लवकरच निश्चित केले जाणार आहे. ही एकप्रकारची प्रचार यात्राच राहणार असल्याने त्यासाठीचा मार्गही लवकरच ठरविला जाईल. महिने कालावधीच्या पदयात्रेच्या तारखा आणि मार्गसुद्धा निश्चित करण्यात येणार असून ब्लॉक अध्यक्ष यांनी गाव पातळीवर निरीक्षकाच्या नियुक्ती करून तसा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सादर करण्याचे निर्देशही जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.