आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील तूर पिकावर दवाळ गेले, तर अज्ञात रोगानेही त्यावर घाला घातला. परिणामी तूरीचे पीक जळाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. नुकसान झालेल्या तूर पिकाचे तत्काळ सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तुरीची झाडे घेवून तहसील कार्यालयावर सोमवारी (दि. २) धडक दिली. तहसीलदारांच्या टेबलवर तुरीची झाडे टाकून शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना एक तास घेराव घालत निवेदन दिले.
तूर पिकावर दवाळ गेले. त्यामुळे अचानक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तूर वाळायला लागली. खरिप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिराकावल्या गेला. आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. त्यात पिक विमा अद्याप मिळाला नाही. त्यात भरीस भर म्हणून आशा टिकवलेल्या खरिपातील तुरीवर दवाळ गेल्याने शेतकऱ्यांचे भरघोस पिकाचे स्वप्न हे सवप्नच राहिले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच त्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने तूर पिकाचे सर्व्हेक्षण करण्यात यावे तसेच पीक विमा देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तुरीची झाडे तहसीलदारांच्या टेबलावर टाकून एक तास घेराव घालत रोष व्यक्त केला.
नुकसान भरपाईचया मागणीचे निवेदन देताना सरपंच मंगेश कांबळे, माजी सरपंच मधुकर कोठाळे, श्रीकृष्ण सोळंके, मनदेव चव्हाण, अक्षय राणे, आशिष भाकरे, गुणवंत चांदूरकर, रवी ठाकूर, रमेश पेटकर, दीपक सुने, चेतन डकरे, दिनेश पकडे, प्रमोद डकरे, लीलाधर चौधरी, बालू झिमटे, सौरभ सुने, शुभम सावरकर, अनिल मारोटकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
विमा द्या; अन्यथा आत्मदहनाचा इशारा
सात दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा न झाल्यास शेतकऱ्यांसह सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रकाश मारोटकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला असून त्याला कृषी अधिकारी व तहसीलदार जबाबदार राहील, असे ही सांगीतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.