आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या विविध अभ्यासक्रमांच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. मात्र, अजूनही बी. एस्सी तसेच विधीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी याची दखल घेत विद्यापीठाने तातडीने पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदनातून केली आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल हे ऑगस्ट महिन्यात लागले. परंतु अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तर काही विद्यार्थी नापास देखील झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेत, विद्यापीठाकडे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. मात्र, या पुनर्मूल्यांकनाचा निकाल अजूनही न लागल्याने विद्यार्थ्यांना पुढील सत्रासाठी व शिक्षणाच्या प्रवेशामध्ये अडचणी येत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे म्हणने आहे.
त्यामुळे विद्यापीठाने तातडीने निकाल लावावा, पुनर्मूल्यांकनाचा निकाल हा सात दिवसातच लावण्यात यावा, मूल्यांकन व पुनर्मूल्यांकनासाठी टाळाटाळ करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी, तसेच आगामी परीक्षांचे निकाल योग्य व वेळेत लावण्याची मागणी निवेदनातून केली. यावेळी प्रांत सहमंत्री अनिकेत पझई, सरोजिनी वेळूकर, महानगर सहमंत्री ऋषिकेश चौधरी, अनुराग बालेकर, विद्यापीठ प्रमुख श्रेयस देशमुख, रिद्धेश देशमुख उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.