आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर-औरंगाबाद महामार्ग अंतर्गत पुलगाव ते मंगरूळ चव्हाळा महामार्गावरील खड्ड्याने एका आठवड्यात तीन बळी घेतले. रस्त्यावरील खड्डे बुजवल्यांचे फोटो दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधी व शिंदे-फडणवीस सरकारने या अपघाताची जबाबदारी स्वीकारून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना तात्काळ दहा लक्ष रुपयांची आर्थिक मदत करावी. अशी मागणी माजी आमदार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांनी केली आहे.
खड्डे त्वरेने न बुजविल्यास काँग्रेस पक्षातर्फे चक्काजाम आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
खड्ड्यामुळे महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
नागपूर -औरंगाबाद या महामार्गावरील पुलगाव- मंगरूळ चव्हाळा लांबीचा महामार्ग खड्यामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. मोगरा येथील अजय कांबळे, मंगरूळ चव्हाळा येथील ज्ञानेश्वर झोपाटे तर शनिवारी शेंदुरजना खुर्द येथील भूमिका महादेव समोसे या तिन्ही युवक-युवतीचा बळी रस्त्यावरील खड्ड्यांनी आठवडाभरात घेतला आहे.
दिवाळीपूर्वी देवगाव-तळेगाव दशासर मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असतानाची छायाचित्रे आमदार महोदयांनी काढून त्या कामाचे श्रेय मिळविले. परंतु दोनच दिवसात काम बंद झाल्यानंतर उर्वरित काम करून घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. परिणामी या महामार्गावर तीन युवक, युवतीचे बळी गेले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे प्रा. जगताप यांचे म्हणणे आहे.
स्थानिक आमदारांचे दुर्लक्ष
या महामार्गावरील अपघातामध्ये बळीची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना महामार्गाचे अधिकारी तसेच स्थानिक आमदार यांचे दुर्लक्ष होणे ही अत्यंत खेदाची बाब असल्याचेही माजी आमदार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्वरित युद्ध पातळीवर या महामार्गावरील खड्डे योग्यरीत्या बुजवून यानंतर बळी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. खड्डे न बुजवल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.