आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतवाडालगत असलेल्या देवमाळी ग्रामपंचायत परिसरात एका ८२ वर्षीय तक्रारदाराला तत्कालीन सरपंच पती व सरपंचाकडून सहा वर्षांपूर्वी बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्या वृध्दाचा मृत्यू झाला होता. या खूनप्रकरणात अचलपूर येथील जिल्हा न्यायाधीश (क्रमांक २) एस. एन. यादव यांच्या न्यायालयात माजी सरपंच पतीविरुद्ध दोष सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने सरपंच पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याचवेळी देवमाळीच्या तत्कालीन सरपंच महिलेची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निर्णय न्यायालयाने शुक्रवारी (दि. १०) दिला आहे. विधी सूत्रानुसार, भास्कर विठ्ठलराव चौधरी (६६, रा. देवमाळी, परतवाडा) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या माजी सरपंच पतीचे नाव आहे. याचवेळी माजी सरपंच विद्या भास्कर चौधरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. गणेशराव हरिश्चंद्र चौधरी (८२, रा. देवमाळी, परतवाडा) असे मृतकाचे नाव आहे.
गणेशराव चौधरी यांनी आरोपींच्या भ्रष्ट्राचाराविरोधात असंख्य तक्रारी केल्या होत्या, तर आरोपींनी देखील गणेश चौधरी यांच्या मंगल कार्यालयाबाबत तक्रार केली होती. याच कारणातून ३० जून २०१७ रोजी दुपारी गणेश चौधरी हे देवमाळी ग्रामपंचायत सचिव ढेरे यांच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेण्यासाठी गेले असता, ते पाहून भास्कर चौधरी यांनी वाद घातला. भांडण इतके वाढले की भास्कर आणि त्याची पत्नी विद्या यांनी गणेशराव चौधरी यांना मारामारी केली. ज्यामध्ये गणेश यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गणेशराव चौधरी यांचा मुलगा प्रवीण यांनी परतवाडा पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या खटल्यात सहायक सरकारी वकील अॅड.सुनील देशमुख यांनी १२ साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या. ज्यामध्ये भास्कर विठ्ठलराव चौधरी याच्याविरुध्द दोष सिध्द झाला व न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील सुनील देशमुख यांनी यशस्वी युक्तिवाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.