आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक:पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच जिल्ह्याच्या भूजल पातळीत 1.79 मी.पर्यंत वाढ

अमरावती / स्वप्निल सवाळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखंडित व भरपूर पाऊस, जलयुक्त शिवारसह जलसंधारणाबाबत जनजागृतीमुळे मागील पाच वर्षांत प्रथमच यंदा जिल्ह्यातील भूजल पातळीत १.७९ मीटरपर्यंत समाधानकारक वाढ झाली आहे. अन्यथा आजवर चिंताजनकरित्या भूजल पातळीत घट होत होती. २०१८ मध्ये तर कमी पाऊस व मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा होत असल्याने ३ मीटरपर्यंत घट झाली होती. ती यंदा पूर्णपणे भरून निघाली असून त्यात समाधानकारकरीत्या पावणे दोन मीटरपर्यंत वाढ झाली हे विशेष.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात ८८५ मि.मी. सरासरी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात आतापर्यंत १००६ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) वर्षांतून चार वेळा एप्रिल, जून, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात १४ ही तालुक्यांमधील १५० निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण केले. त्यानंतर भूजल पातळी वाढल्याचे समाधानकारक निरीक्षण नोंदवले आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस सुरूच राहिला. यादरम्यान ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झाले व त्याचे सुखद परिणाम आता पुढे आले आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा भूजलाची पातळी वाढली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य फारसे जाणवणार नाही. तसेच सिंचनालाही मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

यंदाच्या मोसमात दररोज व अखंडित पावसाची हजेरी यंदाच्या माेसमात जिल्ह्यात दररोज तसेच कोणताही खंड न पडता सलग पाऊस झाला. तसेच जल संधारण उपाय योजनांकडे कल वाढल्यामुळे गेल्या पाच वर्षांत प्रथमच जिल्ह्यातील भूजल पातळीत समाधानकारकपणे वाढ झाली आहे. -संजय कराड, भूवैज्ञानिक व उपसंचालक, भूजल सर्वेक्षण.

बातम्या आणखी आहेत...