आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात ठेवलेला लाखोंचा शेतमाल भिजला होता. यामध्ये व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे धान्य असल्याने सोमवारी नुकसान भरपाई करिता शेकडो शेतकरी बाजार समितीवर धडकले होते. याची दखल घेत प्रशासक राजेश लव्हेकर यांनी पंचनामे सुरू केले आहे.
आतापर्यंत ५७ शेतकऱ्यांचे पंचनामे आटोपले असून, त्यांच्या शेतमालाची मोजणी केल्या जात आहे. त्यामुळे याची पूर्ण चौकशी करूनच भरपाई मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात रब्बीतील धान्यांची मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये आवक सुरू आहे. अमरावती बाजार समितीमध्ये अमरावती आणि भातकुली या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता येतात.
शनिवारी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य साठवले असतानाच दुपारी शहरात अचानक मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे बाजार समिती परिसरात असलेले संपूर्ण धान्य पाण्यात भिजले. त्यामुळे आता भिजलेले धान्य घेण्यास खरीददार कमी दरात घेत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याशिवाय बाजार समितीनेही यापूर्वी याची जबाबदारी झटकली असता सोमवारी शेतकरी बाजार समितीवर धडकले होते. याची दखल घेत प्रशासक लव्हेकर यांनी पंचनामा करण्याचे आदेश सचिवांना दिले. यातील ५७ शेतकऱ्यांचे पंचनामे आटोपले असून, त्यांच्या शेतमालाची मोजणी केली जात आहे. शेतमाल पाहून तसेच इतर चौकशीनंतरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता कुणाला नुकसान भरपाई मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.