आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअपघातातील रुग्णांच्या भेटीसाठी सोमवारी (दि. ७) रात्री माजी मंत्री तथा आमदार अॅड. यशोमती ठाकूर इर्विन रुग्णालयात पोहोचल्या होत्या. त्यांनी रुग्णांची भेट घेतली. त्याचवेळी इर्विनमधील वॉर्ड व परिसरातील अस्वच्छता पाहून आमदार ठाकूर चांगल्याच संतापल्या. उपमुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील मुख्य रुग्णालयाची ही अवस्था पाहून सरकारचा कोणताही वचक नसल्याचे त्यांनी म्हटले. ही अस्वच्छता संताप आणणारी असून, या प्रकरणात आपण आगामी अधिवेशनात विधानसभेत प्रश्न विचारणार असल्याचेही आमदार ठाकूर यांनी सांगितले.
तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथे सोमवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. याच अपघातातील चार जखमींवर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू होते. अपघाताची माहिती मिळताच आमदार ठाकूर यांनी नियोजित दौरा रद्द करुन तत्काळ अमरावती गाठले.
‘इर्विन’मध्ये रुग्णांना ज्या ठिकाणी उपचार केले जातात, त्या ठिकाणी अस्वच्छता, परिसरात कचरा, दुर्गंधी हा सर्व प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे आमदार ठाकूर यांनी तत्काळ ‘इर्विन’च्या अधिकाऱ्यांना बोलावले. स्वच्छतेसाठी किती कर्मचारी आहेत, अशी विचारणा आमदारांनी त्यांना केलीत, त्यावर त्यांच्याकडून ७० कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यावर आ. ठाकूर म्हणाल्या की, ७० स्वच्छता कर्मचारी व स्वच्छतेसाठी दरमहा शासनाचे १४ लाख रुपये खर्च होत आहेत, तर अस्वच्छता का आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर उपस्थित अधिकारी देऊ शकले नाहीत. जिल्ह्याच्या मुख्य रुग्णालयाची अवस्था दयनीय आहे. त्यामुळेच आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत ‘इर्विन’च्या अस्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित करणार आहे.
युवक काँग्रेसतर्फे ‘इर्विन’ची स्वच्छता
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील परिसरातसह वाॅर्डामध्ये घाणीचे साम्राज्य असून, यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, यासाठी मंगळवारी युवक काँग्रेसच्या वतीने रुग्णालय परिसराची स्वच्छता करून अभिनव आंदोलन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.