आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूरातून लग्न समारंभासाठी अमरावतीत आलेली महिला नातेवाईकांसह घरी परत जाण्यासाठी कारमध्ये बसत असतांना महिलेच्या गळ्यातील 30 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र पळविण्यात आले होते. ही घटना नवाथे चौकात अडीच महिन्यांपुर्वी घडली होती. या प्रकरणात दोन लुटारुंना राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी (दि. 11) अटक केली. पकडलेल्या दोन लूटारुंमध्ये मुख्य सूत्रधाराचे पॉलीटेक्नीकपर्यंतचे शिक्षण झाले असून दुसऱ्याने आयटीआय केले आहे.
आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (25, रा. प्रजापतीनगर, जळगाव) व दीपक रमेश शिरसाठ (26, रा. वरखडी, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या लुटारूंची नावे आहेत. नागपूर जिल्ह्यातील सोमलपाडा येथील रहिवासी महिला आपल्या कुटुंबासह नवाथे चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये आयोजित लग्न समारंभात आल्या होत्या. लग्न समारंभ आटोपल्यावर त्या घरी परत जाण्यासाठी हॉटेलसमोर उभ्या कारमध्ये बसत होत्या. त्याचवेळी दुचाकीस्वार दोन लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. सदर घटनेनंतर राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला.
तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी लुटारू आकाश व दीपक यांचा शोध लावला. अशात या दोन्हीही लुटारूंना अकोला पोलिसांनी अटक केल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यामुळे आवश्यक प्रक्रीया पार करुन राजापेठ पोलिसांनी या दोघांना आज अटक करून अमरावतीत आणले. लुटारूंकडून मंगळसूत्र चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पीएसआय राहुल महाजन व पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.