आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील खराटेंचा हल्लाबोल:शिवसेनेने हिंदूंसाठी केलेले कार्य जगजाहीर, राणा दाम्पत्यांनी धर्मासाठी काहीच केले नाही - ठाकरे गट

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेने हिंदूंसाठी केलेले कार्य हे जगजाहीर असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना राणा दाम्पत्याने धर्मविरोधी संबोधले. त्याचवेळी राणा दाम्पत्याने हिंदू धर्मासाठी कोणतेही मोठे कार्य केले नाही असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी मंगळवारी (ता. 4) रोजी दुपारी श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रपरिषदेत केला.

स्वतःच वागतात ठाकरेंवर आरोप करतात

खासदार राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावर लवकरच सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यायला हवा. आम्ही निर्णयाच्या प्रतिक्षेत आहोत. त्या मुस्लीम मतांवर निवडून आल्या आहेत. आता त्यांना त्यांचा हेतूपुरस्सरपणे विसर पडला आहे. जे कधी मुस्लीमांप्रमाणे वागायचे तेच उलट उद्धव ठाकरे यांना भाईजान संबोधतात, असे आरोपही खराटे यांनी केला.

नवनीत राणांना खराटेंचा इशारा

आधी खासदार नवनीत राणा स्वत:ला फायर म्हणायच्या. आता हिंदू शेरनी संबोधतात. एवढेच नव्हे तर आता त्या ‘जो रामका नही वो हिंदू नही’ असेही उद्धव ठाकरे यांना संबोधून म्हणतात. तसेच त्यांना भाईजान म्हणण्यासारखे त्यांनी काय केले ते तरी राणा दाम्पत्याने स्पष्ट करावे. उगाच धार्मिक तेढ निर्माण करू नये. सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही खराटे यांनी केली.
नवनीत राणांना तुल्यबळ उमेदवार देणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार पदासाठी उमेदवार देणार आहे. उमेदवाराचे नावही ठरले असून ते नाव मी सांगणार नाही. याआधीही येथे 5 वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. स्थानिक काँग्रेस नेते त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करीत असले तरी वरिष्ठ स्तरावरूनच याबाबत निर्णय होणार असल्यामुळे शिवसेनेचाच उमेदवार असेल, असेही सुनील खराटे म्हणाले.

पत्रपरिषदेला सुनील खराटे यांच्यासह प्रदीप बाजड, धाने पाटील, विकास शेळके, संजय गव्हाळे, नीलेश सावळे, जिल्हा संघटक ज्योती अवघड, युवासेना प्रमुख पंकज चौधरी व इतर उपस्थित होते.