आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात वातावरण कोरडे असून उष्णतेची लाट आहे. ही उष्णतेची लाट ७ जूनपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर वातावरणातील उष्णतेचे प्रमाण हळूहळू कमी होईल. ९ जूनपर्यंत जिल्ह्यात पाऊस येण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. तसेच १० जूनला मात्र मान्सून जिल्ह्यात दाखल होऊन पाऊस येणार असल्याचा असल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे सध्या आपल्या भागात वातावरण उष्ण असून तापमानात वाढ झाली आहे. यंदा संपुर्ण एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात तापमानाने लाहीलाही झाली होती. मात्र मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे उष्णतामान कमी झाले होते. मात्र मागील तीन दिवसांपासून उष्णमानात पुन्हा वाढ झाली आहे. ३ जूनला शहरात पारा थेट ४४.६ अंशावर तर ४ जूनला ४३.६ अंश होता. त्याचप्रमाणे रविवारीसुध्दा (दि. ५) सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहे. ही उष्णतेची लाट सोमवारी रात्रीपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र हळूहळू तापमान कमी होणार आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सुनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता. त्यानूसार २१ ते २३ मे दरम्यान मान्सुन केरळमध्ये धडकला आहे. सद्या मान्सुन गोव्यात असून आज (दि. ५) राज्यात मान्सुन दाखल होणार आहे. असे असले तरी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस ९ जूनपर्यंत येणार नाही.
शेतकऱ्यांनी १५ जुनपुर्वी पेरणी करुच नये
जिल्ह्यात मान्सून १० जूनला दाखल होणार असल्याची सद्या स्थिती आहे. १० जूनला मान्सुनचा पाऊस आल्यावरही सलग तिन दिवस जोरदार पाऊस (किमान १०० मिमी) झाल्यानंतर तसेच जमिनीत सुमारे अडीच ते तीन फुट ओल तयार झाल्याशिवाय पेरणी करु नये. ही परिस्थिती १५ जूनपुर्वी तयार होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी १५ जुनपुर्वी पेरणी करू नये. -डॉ. सचिन मुंढे, कृषी हवामान तज्ज्ञ, कृषी विज्ञान केन्द्र, दुर्गापूर (बडनेरा)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.