आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ आणि दारव्हा तालुक्याच्या सीमेवर असलेले दिघोरी, वरुड गावाला ४० वर्षांपासून ग्रामपंचायत अस्तित्वात नव्हती. त्यामुळे ही गावे विकासापासून कोसो दूर होती. विविध अडथळ्यांचा सामना करत दिघोरी गावाला स्वतंत्र गावाचा प्रस्ताव प्राप्त झाला. आता गावात वाॅर्ड रचना करून ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात यावी या मागणीसाठी सोमवार, १९ डिसेंबरला दिघोरी येथील ग्रामस्थांनी जिल्हा कचेरीवर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सन १९८२-८३ मध्ये जिल्ह्यातील तालुक्याची पुनर्रचना करण्यात आली. त्यात मोझर हे गाव दारव्हा तालुक्यात आले. दिघोरी, वरुड इजारा या दोन्ही गावांचा समावेश यवतमाळ तालुक्यात झाला. मूळ मोझर ग्रामपंचायत दारव्हा तालुक्यात गेल्याने दिघोरी आणि वरुड इजारा गावाला ग्रामपंचायतीमधून काढण्यात आले. त्यानंतर शासकीय योजनेपासून दिघोरी, वरुड इजारा गाव सन १९८३ पासून वंचित राहत आहे. सन २०११ च्या जनगणनेवरून दिघोरी गावाची लोकसंख्या ८०१, तर वरुड इजारा गावाची लोकसंख्या ४८५ झाली आहे.
गावाचा विकास व्हावा याकरिता आठ वर्षांपासून प्रयत्न केले आहे. शेवटी पालकमंत्री संजय राठोड आणि गावातील पुरुषोत्तम राठोड यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भेटून दिघोरी, वरुड इजारा गावासाठी स्वतंत्र गावाचा दर्जा प्राप्त करून घेतला. आता गावाची वाॅर्ड रचना करून ग्रामपंचायत निवडणूक लावण्यात यावी या मागणीचे निवेदन दिघोरीवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पराग पिंगळे, पुरुषोत्तम राठोड, जितेश झाडे, दीपक माघाडे, देविदास चव्हाण, राम आडे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.