आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासात वर्षांपूर्वी नांदगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. मात्र अद्यापही ३३ वर्षांपासूनची पाणी समस्या ‘जैसे थे’च आहे. आजही शहरवासीयांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील ही पाण्याची समस्या सुटणार तरी कधी, असा प्रश्न नांदगाव खंडेश्वरव सीयांकडून उपस्थिती केला जात आहे.
पाण्याचे नियोजन कमी आणि लोकसंख्या जास्त अशी शहराची अवस्था झाली आहे. त्यातच ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात जमिनीमधील पाइपलाइन व त्यावर असलेले ६४ व्हॉल्व्ह असलेली पाइप लाइन अद्यापही कायम असल्याने शहरातील पाणी समस्या दिवसागणिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. व्हॉल्व्ह, पाइपलाइन व पाण्याच्या स्रोताअभावी पाण्याची समस्या आता प्रचंड वाढत असल्याने नागरिकांनी स्वतः लाखो रुपये खर्च करीत बाेअर करून स्वतःसाठी पाण्याची व्यवस्था केली.
त्यामध्ये काहींना पाणी लागले, तर काहींच्या हातात दगडाशिवाय काहीही आले नाही. आजही नागरिकांना स्वत:च पाण्याची व्यवस्था करावी लागत असल्याने १० कोटींची चांदी प्रकल्प योजना कुचकामी ठरल्याचे चित्र शहरातील १५ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा पाहून लक्षात येते. ग्रामपंचायत काळात पाण्यासाठी १० कोटी रुपयांची योजना आली होती.
मात्र वर्षातील तीन महिने सोडले, तर उर्वरित नऊ महिने भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो, शहरात बरेच ठिकाणी नवीन वसाहती तयार झाल्यात. मात्र तिथपर्यंत साधी पाइपलाइन सुद्धा पोहोचली नाही. तेथील नागरिकांना नाइलाजाने पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. २१ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शहरा नगर पंचायतीकडून वर्षांचा पाणी पट्अी कर वसुल केला जातो. मात्र पाणी पुरवठा केवळ वर्षातील नऊ महिने महिन्यातून दोन वेळा केला जाता. त्यामुळे नागरिक पाण्याच्या समस्येमुळे वैतागले असून, पाण्याचा संघर्ष मिटणार तरी कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने करावे योग्य नियोजन
नांदगाव खंडेश्वर शहराकरिता १० कोटींची चांदी प्रकल्प योजना आणली. आम्ही योजनेचे पक्षाच्या वतीने ऑडिट केले होते. २४ तासांमध्ये दररोज १४ लाख घन लिटर पाणी येते. शहराची तहान सध्या १० लाख लिटरची आहे. शहराला जास्तीचे ६४ आऊट सोर्सिंग व्हॉल्व्ह न ठेवता ४ व्हॉल्व्ह वरच प्रशासनाने नांदगाव शहराचे नियोजन करावे. -श्याम शिंदे, तालुका सचिव, माकप
प्रशासनाने घ्यावे मनावर
चांदी प्रकल्पावरील वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने लवकरच २४ तास विज पुरवठा राहावा याकरिता ऐक्सेस फिडर बसविण्यात यावे, यासाठी आमदार अडसड यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शहराला चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होईल. प्रशासनाने मनावर घेतले, तर सर्व शक्य आहे. -संजय पोफळे, माजी नगराध्यक्ष, नांदगाव खं.
कमी जास्त विद्युत दाबामुळे निर्माण होतेय समस्या
विद्युत दाब कमी जास्त राहत असल्याकारणाने नियमित मोटार पंप चालू राहत नाही. त्यामुळे मुख्य स्त्रोतातून जलसाठा अपूर्ण होत आहे. त्यामुळे शहरात पाणी पुरवठ्यासाठी विलंब होत आहे. संबंधित विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे. -अभिजित लोखंडे, पाणीपुरवठा अधिकारी, नगरपंचायत, नांदगाव खंडेश्वर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.