आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपूर्ण भारतातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन व संत सेवालाल महाराजांचा पंचधातूच्या पुतळ्याचे अनावरण, तसेंच सर्वात मोठ्या सेवाध्वजाची स्थापना येत्या १२ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने बंजारा समाज समन्वय समिती आर्णीच्या वतीने पूर्व तयारी सभा शनिवार, ४ फेब्रुवारी ला स्वामी विवेकानंद विद्यालय आर्णी येथे आयोजित करण्यात आली.
या सभेत १२ फेब्रूवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला ‘एक दिवस समाजासाठी हा संकल्प करून मोठया संख्येने उपस्थित राहावे’, असे आवाहन बंजारा समाजाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अनिल आडे, राजूदास जाधव, प्रकाश राठोड, एन. टी. जाधव, विपीन राठोड, डॉ. विष्णू उकंडे, रोहिदास राठोड, अँड. आरुणा राठोड, जीवन जाधव, डॉ.रामचंद्र चव्हाण, रंजित नाईक, अनिल उपस्थित होते. १२ फेब्रुवारी ला होणाऱ्या ५९३ कोटी रुपयाच्या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित समाज बांधवाना मार्गदर्शन करताना संजय राठोड म्हणाले की, संत सेवालाल महाराज यांचा पंच धातूचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व सर्वात मोठया सेवाध्वज ची स्थापना करण्यात येणार आहे. शिवाय बंजारा समाजाच्या २१ मागण्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह राज्यातील विविध खात्याचे मंत्री यांच्याकडे समाजाच्या माध्यमातून मागण्या मांडता येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजूदास जाधव, तर संचालन सुरेश पवार यांनी केले. यावेळी तालुक्यातील असंख्य बंजारा बांधव उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.