आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्रस शहरातील वाहतूक कोलमडली असल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी बघायला मिळत होते. रस्त्यावर कुठेही वाहने उभी केली जात होती. भाजीपाल्यासह फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या रस्त्यावर फिरत होत्या. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत होती. ही बाब ठाणेदार पांडुरंग फाडे यांनी गांभीर्याने घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी कंबर कसली असून शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने तसेच गुढीपाडवा या दिवशी नवीन वर्षाची सुरवात शिस्तीने व्हावी, यासाठी पोलिस ताफ्यासह रस्त्यावर उतरून वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी, रस्त्यावरील ऑटो, वाहने यांच्यावर कारवाई करणे सुरू केल्याने रस्त्यावरील वाहतुकीने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पहायला मिळाले.
या आधी तत्कालीन ठाणेदार उदयसिंह चंदेल यांनी दिग्रस शहरात रुजू होताच वाहतुकीवर लक्ष केंद्रित करत रस्ता मोकळा केला होता. सतत वाहनांची कागदपत्रे तपासणी करणे सुरू असल्याने वाहतूक सुरळीत होती. त्यामुळे अपघाताच्या घटनांवर अंकुश मिळाला होता. त्यानंतर तत्कालीन ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी पोलिस स्टेशनची धुरा सांभाळत वचक निर्माण केला. सर्वांच्या मनात राहणारा कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा ठाणेदार म्हणून त्यांची ओळख होती.
त्याच्या बदलीमुळे दिग्रस शहराचे चित्र पुन्हा पूर्व पदावर आले होते. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. हीच बाब लक्षात घेत फाडे हे स्वतः पोलिस ताफ्यासह रस्त्यावर उतरले असून वाहनांची तपासणी, प्रतिष्ठान समोर उभी केलेले वाहने रस्त्यावर येऊ न देण्यासाठी दुकानदारांना सूचना देत रस्ता मोकळा करणे सुरू केल्याने पोलिसांची वचक पुन्हा निर्माण झाली असून ही वचक ठाणेदार कायम ठेवतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.