आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याबाहेर कामानिमित्त जाणाऱ्या पाल्यांसाठी निवासी हंगामी वसतीगृह चालू करण्याबाबतचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून बोलावण्यात आले होते. आतापर्यंत एकमेव प्रस्ताव प्राप्त झाला असून, उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील प्रस्तावाचा समावेश आहे. दरम्यान, सोमवार, दि. १४ नोव्हेंबर पर्यंत वसतीगृहाचे प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील बहुतांश कुटुंबीय कामानिमित्त बाहेर जिल्ह्यात जातात. बऱ्याचवेळा पाल्याला सोबत घेऊन जातात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पाल्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होवू नये म्हणून सर्व शिक्षाच्या वतीने निवासी हंगामी वसतीगृह सुरू करण्यात येते.या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक पाल्यांच्या खर्चासाठी पुढील सहा महिन्याकरीता सहा हजार रूपये देण्यात येते.
मागिल वर्षी जिल्ह्यात सहा निवासी हंगामी वसतीगृह सुरू करण्यात आले होते. यात पुसद चार, महागाव आणि उमरखेड येथे प्रत्येकी एक, अशा सहा निवासी हंगामी वसतीगृहाचा समावेश आहे. या सहा वसतीगृहात मिळून ४७८ पाल्यांचा समावेश होता. यंदासुद्धा वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आतापर्यंत उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील एकमेव प्रस्ताव प्राप्त झाला आहे.
कोरोनापासून मजूर बाहेर पडणे टाळताहेत
अडीच वर्षापूर्वी कोरोना संसर्ग वाढल्याने लॉक डाऊन लावण्यात आले होते. अशा परिस्थितीत घराबाहेर पडण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मजूर कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात गेलेच नाही. शेवटी जिल्ह्यात राहूनच मजुरांनी काम शोधले. निवासी हंगामी वसतीगृह चालू करण्याची पाळी प्रशासनावर आलीच नाही. आता मजूर बाहेर जाण्यास टाळत असल्याचे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.