आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण न होता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात १८५ केंद्र संवेदनशील तर, २४ अतिसंवदेनशील असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. एकूण ग्रामपंचायत संख्येच्या निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींची एकाच वेळी निवडणूक असल्याने यंत्रणेवर सध्या मोठा ताण आहे. त्यात, राज्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर ही निवडणूक होत आहे.सरपंचपदासाठी २ हजार तर, सदस्यपदासाठी १२ हजार जण रिंगणात आहेत. बीड जिल्ह्यात एकूण २ हजार ३३० मतदान केंद्रांवरुन मतदान होणार आहे. या पैकी १८५ संवेदनशील आणि २४ अतिसंवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त राहणार आहे.
संवेदनशील ग्रामपंचायती अशा : बीड तालुक्यात ३४, गेवराईत ६, आष्टीत २८, पाटोदा तालुक्यात सर्व ३४, शिरुर तालुक्यात ०६, अंबाजोगाई तालुक्यात ३०, परळी तालुक्यात ११, केज तालुक्यात १२, धारुर तालुक्यात ७, माजलगाव तालुकय्ात ८ आणि वडवणी तालुक्यात ९ ग्रामपंचायती या संवेदनशील आहेत.
यापूर्वी ३६ गुन्हे, २०० आरोपी : ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरुन मागील पाच वर्षांत जिल्ह्यात ३६ गुन्ह्यांची नोंद आहे. यात, २०० आरोपींचा समावेश असून सर्व प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालेले आहेत. या सर्वांवरही प्रशासनाची नजर असणार आहे.
दीड हजार उपद्रवी रडारवर : दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी दीड हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित केली गेली आहे.
बाहेरून पोलिस बंदोबस्त मागवला
राज्यात बीडमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत. त्या अनुषंगाने बंदोबस्त लागणार आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातूनही बंदोबस्त मागवला जाणार आहे. प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.