आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदे वस्तीवरील शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे आता शिंदेवस्तीवरील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सौताडा येथे शिंदेवस्तीला जोडणारा पुल नसल्याने विद्यार्थी, नागरिक, शेतकरी यांना तराफ्यावरुन प्रवास करावा लागत आहे. यात अपघात घडण्याचा धोका आहे.
याबाबत अनेकदा पाठपुराव करुनही प्रशासनाने केवळ आश्वासन दिले आहे. यापूर्वी १३ ऑक्टोबर रोजी शिंदेवस्तीवरील ग्रामस्थांसह रामेश्वर तलावात जलसमाधी आंदोलन दरम्यान तहसीलदार रूपाली चौगुले यांनी गटविकास अधिकारी सुमित जाधव व पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार शेतकऱ्याने अडवणुक केलेल्या रस्त्याची पाहणी करून रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यामुळे जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले होते. परंतु दीडमहिना उलटुनही रस्ता मोकळा करून न दिल्यामुळे ग्रामस्थ फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. तहसीलदार चौगुले यांच्या असंवेदनशील व बेजबाबदार धोरणाच्या निषेधार्थ डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
३० लाखांचा निधी पडून
दरम्यान, आंदोलनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी रस्ता व २ तराफ्यांसाठी ३० लाख रूपये निधी मंजूर केला आहे. केवळ तहसिल कार्यालयाकडुन अडवणुक केलेला रस्ता मोकळा न केल्यामुळे तो निधी पडून आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.