आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्षणिक राग, ताणतणाव आणि कर्जबाजारीपणा यामुळे नागरिकांचा स्वत:वरील संयम सुटत आहे. जिल्ह्यात दर दीड दिवसाला एक जण जीवन संपवत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या ३०४ दिवसांत जिल्ह्यात ४६१ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पाेलिस दप्तरी झाली आहे. आत्महत्यांचा हा आकडा चिंताजनक अाहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये आत्महत्यांच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी जिल्ह्यात बीड तालुक्यात दोन, शिरूर तालुक्यात एक आणि केज तालुक्यात एक अशा एकूण चार आत्महत्यांची नोंद झाली.
मागील महिनाभरात आत्महत्येसाठी निघालेल्या तीन जणांचे पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले. आत्महत्यांची बहुतांश कारणे ही किरकोळ स्वरूपाची असून क्षणिक राग आणि ताणतणावातून आत्महत्या होत असल्याचे दिसत आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात एकूण ४६१ आत्महत्यांची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे,
तर आत्महत्येचा प्रयत्न करून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या व मानसोपचार विभागाकडून समुपदेशन केलेल्या दहा महिन्यांतील व्यक्तींची संख्या १४१ इतकी आहे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्यांची नोंद होत नसल्याने हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र, मिळालेल्या आकडेवारीनुसारही सरासरी काढल्यास सुमारे दोन दिवसाला जिल्ह्यात एक जण आत्महत्येचा प्रयत्न करत आहे, तर दीड दिवसाला एक आत्महत्या नोंद होत असल्याचे दिसत आहे.
आत्महत्येची मानसिक कारणे कोणती? : आत्महत्येचे प्रमुख कारण हे रागावर नियंत्रण नसणे आहे. कुुटुंबातील संवाद कमी झाला आहे. काेरोनानंतर अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. चुकीच्या जीवनशैलीने चिडचिडेपणा वाढतो. यातून असे प्रकार होतात.
नैराश्यातून अात्महत्या?
तंबाखू, दारू, सिगारेट, गुटखा, चहा हे मेंदूला उत्तेजना देणारे घटक आहेत. त्यांचेही प्रमाण कमी असावे. व्यसनाधीनतेतून कर्जबाजारीपणाही वाढतो.
सोशल मीडिया, मोबाइलमुळे चिडचिडेपणा
मोबाइल हा कौटुंबिक संवादात अडथळा ठरत आहे. कोविडनंतर मोबाइलचा वापर वाढल्याचे निरीक्षण आहे. अधिक वेळ मोबाइलवर काढल्यास मेंदू थकून चिडचिडेपणा वाढतो.
तणावरहित राहा : जीवनशैली चांगली ठेवा, व्यायाम-योगा करा, चांगला आहार घ्या, सार्वजनिक-सामाजिक कामांत सहभागी व्हा, अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्यांना गंभीर शारीरिक इजा झालेली आहे. त्यामुळे तणावरहित राहा. - डॉ. सय्यद मुजाहेद, मानसोपचारतज्ज्ञ, बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.