आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखडकपूर्णा उपसा सिंचन प्रकल्पाद्वारे तालुक्यातील मुरादपूर- रोहडा शिवारात कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. मात्र, ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या संगनमताने कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने शेतात पाणी घुसून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. यासंबंधी वेळोवेळी तक्रारी करूनही त्या तक्रारींना संबधित अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
रोहडा येथील तुकाराम अश्रूबा जारे या शेतकऱ्यांची मुरादपूर शिवारात गट नंबर ४६ मध्ये ८९ आर जमीन आहे. याच शेतीमधून खडकपूर्णा प्रकल्पाचा कालवा गेलेला आहे. दरम्यानच्या काळात ठेकेदाराने सदर कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे शेतकरी जारे यांनी खडकपूर्णा विभागाकडे गेल्या चार वर्षांपासून तोंडी व लेखी तक्रारी केल्या. मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. पाऊस पडल्यावर आणि कालव्यामध्ये पाणी सोडल्यानंतर कालव्यातील पाणी शेतात घुसून पिकाचे नुकसान होते.
संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली नाही. अधिकाऱ्यांनी वेळीच शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर शेतकऱ्यांचे नुकसान या काळात टाळता आले असते. तसेच कालव्या शेजारच्या बांधलेल्या नालीमध्ये माती भरलेली असल्याने पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी शेतात घुसत आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बीच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.