आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण मराठी साहित्याचा प्रसारासाठी ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. शासनानेही अशा ग्रामीण संमेलनांच्या आयाेजनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ.एकनाथ मुंडे यांनी केले. पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय, नाथरा येथे ६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कवी डॉ.स्वप्नील चौधरी, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले.
यावेळी नायब तहसीलदार रुपनर, संस्थेचे सचिव डॉ.संतोष मुंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष न.प.परळीचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख, साहित्यिक नागनाथ बडे, प्रा विठ्ठल जायभाय, राजेंद्र पाठक, डॉ.रमेशचंद्र काबरा, सतिश बियाणी, सामाजिक कार्यकर्ते भास्कर चाटे, ज्ञानेश्वर माऊली लांब, पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, उपनिरीक्षक गणेश झाम्बरे, शुभांगी गित्ते, कार्यवाहक मुख्याध्यापिका सुलेखा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या साहित्य संमेलनाचा आरंभ ग्रंथदिंडीने झाला. ज्यामध्ये प्रसिद्ध साहित्यिक, शालेय विद्यार्थी यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा करून महाराष्ट्राच्या अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. उदघाटनानंतर ग्रामीण मराठी साहित्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, कृषी क्षेत्रात, पत्रकारिता क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने गौरवण्यात आले. दुसऱ्या सत्रात डॉ.एकनाथ मुंडे यांच्या ‘लिखित असावे आपुले घरटे छान’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
डॉ.स्वप्नील चौधरी यांनी हे साहित्य संमेलन कौतुकास्पद असून यातून ग्रामीण लेखकांना प्रेरणा मिळेल, असे सांगितले. या ६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्य रसाचा आस्वाद घेण्यासाठी आणि या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई, अकोला, यवतमाळ, पंढरपूर, परभणी, हिंगोली, गंगाखेड, सोनपेठ येथील साहित्यिक, साहित्यप्रेमी, शालेय विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सुलेखा मुंडे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्राला कवितेने भारावून टाकणाऱ्या डॉ.स्वप्नील चौधरी यांच्या वतीने ‘चल दंगल समजून घेऊ’ ही कविता सादर करण्यात आली. या कवितेने उपस्थितांची मने जिंकण्यात आली. मान्यवरांच्या मनोगतानंतर दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या कवी संमेलनामध्ये उपस्थित साहित्यिक नवोदित कवी, बालकवी, शालेय विद्यार्थी यांनी आपापल्या कविता सादर करून उपस्थित साहित्य रसिकांना भारावून टाकले. अशा या ६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्य रसाचा आस्वाद घेण्यासाठी आणि या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने रसिक हजर होते. उपस्थितांनी संमेलनाचे कौतुक केले. नाथरा येथे ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी काढण्यात आली.
यांचा झाला गौरव राजेंद्र पाठक, आत्माराम कुटे, आत्माराम जाधव, स्वप्नील चौधरी, सिंधुताई दहिफळे, संध्याराणी कोल्हे, द.ल.वारे, नागनाथ बडे, डॉ.वसंत सातपुते, डॉ.विठ्ठल जायभाय, बा.बा.कोटमंबे, संजय राठोड, दत्तात्रय महाराज आंधळे, प्रकाश घातगीणे, विठ्ठल चव्हाण आदी मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. बालाजी टाक यांना उद्योग भूषण व आदर्श शेतकरी म्हणून विठ्ठल साखरे व श्रीनिवास मुंडे यांना कृषिमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.