आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोसमस्याग्रस्त:तरुणाई मानसिक आजारांच्या गर्तेत; महिन्याला 1700 मनोसमस्याग्रस्त

स्वप्नील सवाळे | अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रकारचे ताणतणाव, विद्यार्थ्यांमध्ये पालकांच्या अपेक्षांचे ओझे, तरुणांमध्ये रोजगारांची चिंता, हातातून गेलेल्या नोकऱ्या, कौंटुबिक कलह, अतिव्यसन यासह अन्य काही कारणांमुळे मागील काही वर्षांपासून मनोसमस्या ग्रस्तांचे प्रमाण वाढत आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या दोन वर्षांत व त्यानंतर सातत्याने हे प्रमाण वाढतच आहे. जिल्ह्यात आठ महिन्याच्या कालावधीत शासकीय रुग्णालयांमध्ये मनोसमस्येने त्रस्त असलेल्या १४ हजार रुग्णांवर उपचार झाले आहे. यामध्ये १५ ते ३५ या वयोगटातील सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. मागील आठ महिन्यांचा विचार केल्यास सरासरी १ हजार ७५६ रुग्ण दरमहा ‘इर्विन’च्या मनोविकार विभागात उपचार घेण्यासाठी येत आहेत.

निराश वाटतेय? या टोल फ्री क्रमांकावर करा फोन मानसिक आरोग्यासंदर्भात सेवा नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी १४४१६ टोल फ्री सेवा सुरू आहे. या क्रमांकावर २४ तासात संपर्क केल्यास मानसिक आरोग्यासंदर्भात निःशुल्क सल्ला मिळेल. स्थानिक बोलीभाषेमध्ये ही सेवा पुरवण्यात येत आहे. मानसिक आरोग्यासंदर्भात व्यक्ती बोलण्यास टाळाटाळ करतो. त्यांचे एकांतात समुपदेशन गरजेचे आहे. १४४१६ टोल फ्री नंबरवर संबंधित व्यक्ती समस्येसंदर्भात बोलू शकतो.

आठ वर्षांत मनोसमस्या निर्माण झालेले रुग्ण वर्ष रुग्ण २०१४-१५ ११३३३ २०१५-१६ ११६६१ २०१६-१७ १२६३३ २०१७-१८ १२२२८ २०१८-१९ १४७२७ २०१९-२० १५९७२ २०२०-२१ १५६९२ २०२२ (८ महिने) १४०४९

दोन महिन्यांआधी जिल्हा रुग्णालयातील मनोविकास विभागात मेळघाटातील चिखलदरा येथील एक १७ वर्षीय युवक उपचारासाठी आला. हा युवक प्रेमभंग व घरच्यांनी मोठ्या हौसेने खरेदी करून दिलेला मोबाइल हरवल्यामुळे असा काही अंतर्मुख झाला की, कोणाशी एकही शब्द बोलायचा नाही. नंतर त्याची एकूणच मन:स्थिती बघून त्याच्या वडिलांनी त्याला मनोविकास विभागात आणले. केंद्रात प्रथम त्याला दोन तास समुपदेशन करण्यात आले. आश्चर्य म्हणजे काही वेळाने त्या युवकाने बोलण्यास सुरुवात केली. प्रेमभंग झाला. त्याचवेळी घरच्यांनी दिलेला मोबाइलही हरवला. त्यामुळे आपल्याला असा काही धक्का बसला की, कोणाशीही बोलण्याची इच्छा राहिली नव्हती. प्रारंभी मोजकेच बोलत होतो. परंतु, नंतर बोलणेच बंद केले, असे त्या युवकाने इर्विन येथील मनोचिकित्सक डाॅ. भावना पुरोहित यांना सांगितले. अशा युवकांशी त्यांची मन:स्थिती बघून फारच काैशल्याने संवाद साधावा लागतो, असे डाॅ. पुरोहित म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...