आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषिपंपाच्या वीज बिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ १५ दिवस राहिले आहेत. कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीज बिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमही माफ करण्यात येत आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून राज्यात कृषिपंप वीज जोडणी धोरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषिपंपाच्या वीज बिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ८९० शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीज बिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण ७७५ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे वीज बिलांपोटी १०१५ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकी तसेच सर्व चालू वीज बिलांचा येत्या ३१ मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल ५०७ कोटी ५० लाख रुपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार २३९ शेतकऱ्यांनी २४ कोटी ५८ लाख रुपयांचे वीज बिल भरून योजनेत सहभाग घेतला आहे. कृषिपंप वीज जोडणी धोरणानुसार कृषी वीज बिलांच्या चालू व थकीत बिलांच्या भरण्यामधील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हास्तरावर (३३ टक्के) कृषी वीज यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात २५ कोटी २० लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यामध्ये प्रत्येकी ८ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी हा ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील वीज यंत्रणेच्या विकासकामांसाठी वापरण्यात येत आहे.
कृषिपंपांच्या नवीन वीज जोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. सुधारित थकबाकीमध्ये ५० टक्के माफी मिळविण्याची संधी येत्या ३१ मार्चपर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व थकबाकीमुक्त योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.