आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘माय-बाप केवळ काशी, त्याने न जावे तिर्थाशी.’ आईवडिलांच्या चरणातच काशी आणि चार धाम आहेत. परंतु आज समाजात जन्मदात्या आईवडिलांविषयी प्रेम लुप्त होत चालले आहे. मुलांनाच लग्न झाल्यावर आईवडिलाचे ओझे वाटू लागले आहे. परंतु तुम्ही जगभरातील संपत्ती कमवा, तिचे महत्त्व आई-वडिलांसमोर नगण्य आहे. ज्या घरात आई-वडील नावाचा सुगंध दरवळत असतो त्याच घरात भगवंतदेखील सहवास करीत असतो.
कारण आईवडील हा जगातील सर्वात अनमोल ठेवा आहे. जो नित्यनियमाप्रमाणे आईवडिलांची सेवा करीत असतो त्याला साक्षात परमेश्वर भेटण्यासाठी येत असल्याचे माणिक महाराज शेळके यांनी सांगितले. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे वर्षे २१ वे अखंड हरिनाम सप्ताहात दुसऱ्या चरणातील पुष्प गुंफताना ते बोलत होते. आजच्या तरुणांनी श्रावण बाळाप्रमाणे आई वडिलाची सेवा केली पाहीजे.
उतारवयातच आई-वडीलांना आपली खरी गरज असते. त्या काळातच त्यांची लहान लेकराप्रमाणे सेवा केली पाहीजे. कारण आपण लहान असताना आई-वडील आपल्याला मोठे करेपर्यंत मोठे हाल-अपेष्ठा सहन करत असतात. त्यासाठी त्यांच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी तुम्ही त्यांचे दास व्हा. असे केल्यास परमेश्वर तुम्हाला कशाशीच कमी पडू देणार नाही. न मागता सगळं तुमच्या पदरात टाकेल.
तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुणांनी आत्मविश्वासाने ध्येयाची उंच भरारी घेतली पाहीजे. जो मनामध्ये ध्येय ठेवुन वाटचाल करीत असतो. तोच जिवनात यशाचा डोलारा उभा करीत असल्याचे माणिक महाराजांनी सांगितले. इतिहास जर चाळला तर शिवबांच्या काळातील मावळे हे शिवबांसाठी मृत्यूला आलिंगन देण्यासाठी तयार होते. शिवाबाने देखील आपल्या आईच्या प्रेरणेने स्वराज्याची स्थापना करुन एक आगळावेगळा कधी न पुसणारा इतिहास रचला आहे. परंतु आजच्या कलयुगातील मावळे हे आपल्या आई वडीलांना वृद्धाश्रमात पाठवत आहे.
ही खुप मोठी शोंकातीका आहे. शिवबांनी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवाची बाजी लावून समाजाची व देशाचे रक्षण केले. त्याचप्रमाणे आजच्या तरुणांनी देखील शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगले पाहिजे. शिवाय आज पर्यावरण संतुलन बिघडत चालले आहे. यासाठी प्रत्येक तरुणाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढे आले पाहीजे. प्रत्येकाने आपण निसर्गाचे काही तरी देण लागतो या उद्देशाने आता पावसाळ्यात एक तरी झाड लावुन पर्यावरणाची हानी भरुन काढण्याचा प्रयत्न केला पाहीजे. असा सल्ला माणीक महाराजांनी या वेळी दिला.
जन्माला आला तो जाणारच
परमेश्वराने प्रत्येकाला जन्माला घातले आहे. ज्याप्रमाणे जन्माला घातले त्याप्रमाणे तो वेळ आली तेव्हा प्रत्येकाला घेऊनदेखील जाणार आहे. कारण मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य आहे. यासाठी आहे तोपर्यंत प्रत्येकाशी प्रेमाने वागा. आपले कर्म चांगले ठेवा. कामात प्रामाणिकपणा ठेवा. दुसऱ्यांच्या कामात काड्या करू नका. कारण एक दिवस जावेच लागणार आहे. त्यासाठी या रंगमंचावर आपल्यापासून लोकांच्या भावना दुखणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनदेखील शेळके महाराजांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.