आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लक्षवेधी:​​​​​​​आयजी साहेब... 21 जण मुख्यालयाशी अटॅच; 5 महिन्यांतील 200 चोऱ्यांचा तपास लागेना; आयजी घेणार आढावा मल्लिकार्जुन प्रसन्ना आठ महिन्यांनंतर आज जालन्यात

जालना2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठाण्यांचा असा आहे अहवाल 1 जानेवारी 2021 ते 13 जून 2021 पर्यंत

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी जालना जिल्ह्याचा ऑक्टोबर २०२० मध्ये आढावा घेत सूचना केल्या होत्या. बदल केले की नाही, याचे प्रगतिपुस्तक पाहण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ असा इशाराही त्या वेळी दिला होता. दरम्यान, आयजी मंगळवारी जालन्यात येऊन पुन्हा आढावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनीही त्यानंतर बहुतांश बदल केले आहेत. गुन्हेगारांशी सलगी, लाचखोरी करणे, वरकमाईसाठी पोलिस दलाचे नाव खराब करणाऱ्या २१ जणांना मुख्यालयाशी अटॅच करीत सात जणांना काम सुधारण्याच्या नोटिसाही काढल्या आहेत. दरम्यान, पाच महिन्यांत ३५० चोऱ्या झाल्या. यातील जवळपास दीडशे चोऱ्यांचा तपास पोलिसांनी लावला. मात्र २०० चाेऱ्यांचा तपास अजून लागला नाही. चांगली कामे करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना १२०० रिवॉर्डही देण्यात आले आहेत.

जालना जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या केवळ १८०० आहे. त्यातच लोकप्रतिनिधींचे दौरे, आंदोलन, उपोषणे, बाजारपेठा यासाठी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागत आहे. लॉकडाऊन काळात तर गुन्हे वाढण्याचे प्रमाणही वाढले होते. दरम्यान, मध्यंतरीच्या काळामध्ये दुचाकी चोरून नेणे, घरातील ऐवज लुटणे, किराणा, मेडिकल दुकान, घरफोड्यांच्या घटनांमुळे जालनेकरांची झोप उडाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पेट्रोलिंगमध्ये काही बदलही केले आहेत. तसेच जे कर्मचारी कामे करीत नाहीत, कामचुकारपणा करीत आहेत, आरोपींशी संबंध ठेवतात अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवायांसह काहींना नोटिसाही दिल्या आहेत. दरम्यान, शहरातील ज्या भागांमध्ये वारंवार चोऱ्यांच्या घटना घडल्या. त्या भागांतही पेट्रोलिंग वाढवण्यात आली. दरम्यान, आयजी येणार असल्यामुळे पोलिस प्रशासनाकडून चांगली तयारी केली जात होती.

जिल्ह्यातील सर्व ठाण्यांकडून त्यांच्या हद्दीत घडलेले गुन्हे, तपास केलेले गुन्हे, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळालेले रिवॉर्ड आदी सर्व माहिती संकलित करून मीटिंगसाठी तयार करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, काही अधिकारी, कर्मचारी गुन्हेगारांशी संबंध ठेवून वरकमाई करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशांवर पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली. गुन्हे उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, सदर बाजारचे संजय देशमुख, चंदनझिऱ्याचे यशवंत जाधव, तालुक्याचे देविदास शेळके, कदीमचे टाक यांच्यासह त्या-त्या ठाण्यातील डीबी पथके तपास करीत आहेत.

जालनेकरांच्या चर्चेतील कदीम ठाणे तपास कामात मागे
तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्यासह कदीम ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, होमगार्ड व इतर कर्मचाऱ्यांनी एका जणास मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले. या ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी चांगलीच अरेरावी करतात, गोळीबार प्रकरणातही बऱ्याच तक्रारी झाल्या. या ठाण्याच्या तपासाचे कामही खूप मागे असून, यापाठोपाठ तालुका ठाण्याचेही डिटेक्शनचे काम ढासळलेले आहे.

जुगार, दारूच्या गुन्ह्याच्याही ४०२ घटना
भाग १ ते ५ असलेल्या जिल्ह्यात १ हजार ३७४ गुन्हे घडले आहेत. यात जुगाराचे ७९ गुन्हे घडले असून, हे सर्व गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. दारूबंदीचे १६१ गुन्हे घडले आहेत. इतर भाग ६ मधील १२४ गुन्हे घडले आहेत. यात बहुतांश गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास लावला आहे.

बहुतांश बदल केले आहेत
जिल्ह्यात बहुतांश बदल करण्यात आलेले आहेत. काम करणाऱ्यांना रिवॉर्ड तर कामात हलगर्जी व आरोपींशी सलगी ठेवणाऱ्यांना मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. कामे सुधारण्यासाठी काहींना नोटिसाही काढण्यात आल्या आहेत. विनायक देशमुख, पोलिस अधीक्षक, जालना.

लॉकडाऊन काळात ९० विनयभंग
जिल्ह्यात जानेवारीपासून बहुतांश महिने लॉकडाऊनमध्येच गेले आहेत. यात जिल्ह्यातील विविध ठाण्यांत ९० विनयभंगाच्या घटना घडल्या. यात पोलिसांनी चांगला तपास करून ७६ गुन्हे उघड करून आरोपींना जेरबंदही केले.

आयजींनी या दिल्या होत्या सूचना

  • निष्क्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागी गुन्हेगारांच्या माहितीसह कौशल्य असणाऱ्यांना त्या ठिकाणी नियुक्ती द्या​​
  • गुन्ह्यांच्या तपासाची गुणवत्ता सुधारून गुन्हे दोषसिद्धीसह ठाण्यांतील तपासी अंमलदारांनी विशेष प्रयत्न करावे.
  • दारूबंदीच्या प्रलंबित गुन्ह्यांची कारणे पडताळून घ्यावीत, तत्काळ तपास दोषारोपपत्र दाखल करून घ्यावे.
  • चोऱ्यांच्या गुन्ह्यांत तपासी अंमलदार यांनी झालेल्या तपासाची कागदपत्रे वरिष्ठांना १५ दिवसांपूर्वीच पडताळणीसाठी द्या.

जानेवारी ते मार्चच्या ९० दिवसांमध्ये असे घडले गुन्हे
गुन्हा दाखल उघड
खून १६ १५
बलात्कार १३ १३
दरोडा ०६ ०६
सर्व चोऱ्या ३४९ ९७

जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठाण्यांचा असा आहे अहवाल १ जानेवारी २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत
ठाणे दाखल उघड प्रलंबित
सदर बाजार ४०० ३०७ ९३
कदीम २८५ ११० १७२