आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनास दिले. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान पाहणी दौऱ्यासाठी आले होते. अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात १६ मार्च रोजी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांसह मोसंबी बागेतील फळांची मोठी फळगळ होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी शनिवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे बीड येथून भोकरदनकडे जात असताना वडीगोद्री परिसरातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी अंतरवाली सराटी शिवारात संजय तांदळे यांच्या शेतातील वादळी वाऱ्यासह गारपिटीने आडवा झालेल्या गहू पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. या पाहणी दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भिमराव रणदिवे यांना दिल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार धनश्री भालचिम, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, बप्पासाहेब काळे, उमेश बर्वे, सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी हनुमंत काळे, कैलास माने, ऋषिकेश लिपणे, पवन पवार, रविंद्र घाडगे यांच्यासह परिसरातील शेतकरी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.