आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मानी संकट:खरिपातील नुकसानीचा रुपयाही मिळाला नाही, आता‎ पुन्हा अडीच लाख हेक्टरवरील रब्बी पिकांना तडाखा‎

जालना‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरिपात शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका‎ बसला होता. परंतु जलसाठे तुडुंब असल्याने‎ शेतकऱ्यांनी निराश न होता नव्या जोमाने रब्बीची‎ लागवड केली. मात्र, ऐन हातातोंडाशी आलेला घास‎ होळी व धूलिवंदनाच्या दिवशी झालेल्या अवकाळी‎ पावसाने हिरावला गेला आहे. यामुळे रब्बीतील गहू,‎ ज्वारी, हरभरा ही पिके आडवी झाली असून‎ जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार ३० हेक्टरचे नुकसान‎ झाले आहे. गतवर्षी खरिपातील सप्टेंबर-आॅक्टोबरमधी‎ ल ३ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे‎ झालेल्या नुकसानीचा छदामही मिळाला नाही. आता‎ पुन्हा रब्बीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे मदत‎ नेमकी कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे डोळे‎ लागले आहेत.‎ अगोदर खरीप व आता रब्बी अशी दोन्हीही‎ हंगामातील पिके वाया गेल्यामुळे शेती करावी की नाही,‎ असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. डिसेंबर‎ ते जानेवारी या महिन्यात कडाक्याची थंडी राहते, जी‎ पिकांसाठी पोषक ठरते.

मात्र, असे न होता थंडीचे‎ प्रमाण कमी झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला‎ आहे. त्यानंतर पिकांना जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान‎ वाढत्या धुक्याचा फटका बसला आहे. ऐन फुलोरा अन्‎ दाणे भरण्याच्या स्थितीत धुक्यामुळे गव्हाला फटका‎ बसला. आता काढणीच्या स्थितीतील पिकांना‎ बेमोसमी पावसाचा फटका बसला. दरम्यान, बदनापूर,‎ भोकरदन, जालना, जाफराबाद या तालुक्यांत मोठ्या‎ प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.‎

विमा कंपनीला‎ नुकसानीची ७२‎ तासांत माहिती द्या
‎शेतकऱ्यांनी रब्बी‎ हंगामासाठी हरभरा, गहू‎ किंवा इतर पिकांचा विमा‎ उतरवण्यासाठी‎ एचडीएफसी इर्गो या‎ कंपनीकडे रक्कम भरली‎ आहे. त्या कंपनीच्या‎ प्रतिनिधींना किंवा अॅपच्या‎ माध्यमातून शेतकऱ्यांनी ७२‎ तासांच्या आत पीक‎ नुकसानीची माहिती‎ कळवावी, असे आवाहन‎ करण्यात आले आहे.‎

भोकरदन, जाफराबादेत वीज पडून सहा जनावरे दगावली‎
जिल्ह्यात गत ४८ तासात वीज पडून सहा जनावरे‎ दगावली असून यात चार गायी व दोन म्हशींचा‎ समावेश आहे. यापैकी दोन गायी व एक म्हैस‎ भोकरदन तर दोन गायी व एक म्हैस‎ जाफराबादेतील असल्याची माहिती‎ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात‎ आली.सोमवार, मंगळवार दोन्ही दिवस वादळी‎ वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे‎ शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. आठही‎ तालुक्यात मिळून एकूण १.३० मि.मी. पावसाची‎ नोंद झाल्याचे पर्जन्यमापकावरील नोंदीत म्हटले‎ आहे, मात्र पिकांच्या नुकसानीची आकडेवारी‎ बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त‎ नव्हती. यामुळे वीज पडून जनावरे दगावल्याचा‎ अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात‎ आला आहे. दरम्यान, जिल्हात तृणधान्ये,‎ कडधान्ये, अन्नधान्ये, करडई, जवस, तीळ,‎ सूर्यफूल आदी पिकांची लागवड झाली आहे.‎

आधीच शेतमालाला भावनाही, त्यात‎ तडाखा, शासनाने मदत द्यावी
‎मागील हंगामात बेमोसमी पावसामुळे सोयाबीन पिकाचे‎ मोठे नुकसान झाले होते. जवळपास अर्धे पीक पाण्यात‎ होते. गुडघाभर पाण्यातून सोयाबीनची काढणी केली‎होती. तसेच शेंगांना कोंब फुटले होेते.‎शिवाय हाती आलेले सोयाबीन बेभाव‎विकावे लागले. या नुकसानीचे‎महसूल तसेच कृषी विभागाकडून‎पंचनामे करून अहवाल शासनाला‎दिला होता. याची मदत मिळेल असे‎ सांगण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत हातात दमडीही‎ आली नाही. पीक विम्याची रक्कमही मिळाली नाही. या‎ हंगामात दीड एकरावर ज्वारीची लागवड केली आहे.‎ सध्या हे पीक काढणीला आले आहे. दाणेही चांगले‎ भरले आहेत. मात्र, ज्वारीचे पीक पूर्णत: आडवे झाले‎ आहे. याची काढणी करणे हे माेठे खर्चिक काम होणार‎ आहे. सोंगणीसाठीही मजुरांकडून अडवणूक होईल.‎ शिवाय गुणवत्ता खराब झाल्याने याला चांगला दरही‎ मिळणार नाही. शेतमाल वाया गेल्यानंतर शासनाच्या‎ मदतीने काय होणार आहे? आता पंचनामा होईल.‎ त्यानंतर मदतीची घोषणा होईल. प्रत्यक्षात मदत कधी‎ मिळेल हे कुणालाच माहीत नाही. ही सत्य परिस्थिती‎ आहे. यापेक्षा आमचा शेतमालच लाखमोलाचा आहे.‎ -सीताराम बबन गिराम, शेतकरी सिंधीकाळेगाव‎

बातम्या आणखी आहेत...