आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखुर्चीसाठी आज प्रत्येक जण भांडतो आहे. खुर्ची सर्वांनाच प्रिय असली तरी सर्वांना मिळत नाही. प्रत्येकाच्या नशिबात ती नाही. तरीही मनुष्य खुर्चीसाठी भांडतांना दिसत आहे. खुर्ची मिळेलही परंतू त्यासाठी कर्म आणि कर्तव्य भाव जपला पाहिजे, असा हितोपदेश डॉ. गौतममुनिजी मसा यांनी केला.
गुरु गणेशनगरमधील तपोधाममध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर दर्शनप्रभाजी, गुलाबकंवरजी, हर्षिताजी यांची उपस्थिती होती. डॉ. गौतममुनिजी म्हणाले, मन, वचन आणि काया हे तिन्ही चांगले ठेवले पाहिजे. पद अणि प्रतिष्ठा नको त्यांना मिळाली की होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. आत्म्याला क्रोधापासून दूर ठेवा. केवळ ज्ञान म्हणजेच दर्शन आत्मा आपल्याला लाभली पाहिजे. चारित्र्य हा एक चांगला गुण असून तो प्रत्येकाने जोपासला पाहिजे. चेतना दिली की आत्मा हा जागृत होतो.
चेतना देण्याचे धैर्य आपल्यात आहे का? हा खरा प्रश्न असून आत्म्याला शुध्द ठेवायचे असेल तर त्यासाठी आपला स्वभाव देखील बदलला पाहिजे. घर आनंदी राहावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु ते कधी आनंदी राहिल? ममता असेल तर घर आनंदी राहिल. मग ते किरायाचे का असेना! आपल्या घरात आनंद पाहिजे असे केवळ वाटून फायदा नाही तर त्यासाठी आपले कर्म देखील तसेच पाहिजे. आपल्या ममत्व भाव असला पाहिजे.
प्रत्येक जण आपल्याला आपला वाटला पाहिजे. शुध्दता हा आत्म्याचा गुण आहे. असाच गुण आपल्याकडे देखील असायला हवा. गृहस्थ जीवन जगतांना अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. परंतु जिनवाणी काय सांगते? पुण्यकर्म केल्याने घरात आनंद राहणार नाही का? पुण्यकर्म करायला शिका. आत्म्याच्या शक्तीला ओळखा. जो आत्म्यात आहे तो दुसरे कशातही नाही.
तत्पूर्वी वैभवमुनिजी मसा यांनीही दिपसुत्रावर आधारित विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले, आपल्यात निर्मलता, शांती हवी. हे दोन्ही गुण ज्यांच्या अंगी आहेत. ती व्यक्ती नेहमी आनंदी राहते.अशोक वृक्षाचं एक महत्व असून केलेल्या घटनेचे आपण चिंतन केलं पाहिजे. चिंतन करणं ही काही वाईट सवय नाही. सुधर्मा स्वामींनी चिंतनाची अनेक उदाहरणे सांगितली आहेत. देवता जेव्हा फुलं टाकतात तेव्हा तीर्थंकर भगवंत गोलाकार फिरत असतात.
त्या गोलाकारातूनच आपल्याला प्रकाश मिळत असतो. लाईट गेली तर प्रकाश राहतो का? एखाद्या वस्तुत आपले प्रतिबंब दिसावे असे वाटत असेल तर जी वस्तू प्रतिबंब देते, ज्यातून दिव्य शक्ती प्रगट होते, ती दूर- दूर जाईल परंतु तिच्या जवळ पोहोचण्याचे काम आपल्यालाच करावे लागणार आहे. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे आजी- माजी पदाधिकारी, श्रावक- श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.