आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील जुईधरण ते वालसांवगी राज्यमार्ग(२१५) या रस्त्यासाठी अर्थसंकल्पीय बजेट मधुन ९ कोटी रुपयाचा निधी मागील काही महिन्यापूर्वी आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. सदर रस्त्यावर खड्डे दबाईचे काम देखील पूर्ण झाले आहे. परंतु आता या रस्त्यावर डांबरीकरण केव्हा करण्यात येणार असा सवाल या भागातील नागरिक व प्रवाशांतून विचारला जात आहे.
पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. मागील अनेक वर्षापासून जुईधरण ते वालसांवगी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती. या रस्त्यावर जागोजागी मोठाले खड्डे पडलेले होते. उत्तर भोकरदनमधील नागरिकांना प्रशासकीय तसेच इतर कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचे झाल्यास तारेवरची कसरत करत भोकरदन गाठावे लागत असत. या रस्त्याचे काम व्हावे म्हणून अनेकदा विविध सामाजिक संघटनेनेनी शासन दरबारी निवेदनाचा पाऊस पाडत रास्ता रोको आंदोलने केली होती. त्यावेळी कुठे या रस्त्याचे काम टप्पा पध्दतीने पूर्ण झाले होते. परंतु झालेल्या कामात संबंधित कञांटदाराने गुणवत्ता ठेवली नसल्याने वर्षभरातच या रस्त्याचे पितळ उघडे पडले. रस्ता झाल्यानंतर काही वर्षातच या रस्त्यावर पुन्हा जागोजागी खड्डे पडायला सुरूवात झाली होती.
पावसाळ्याच्या दिवसात तर रस्त्यावर खड्ड्यात पाण्याचा डोह साचल्याने वाहृन चालकांना खड्याचा अंदाज न आल्याने वाहनाचे देखील मोठ्या नुकसान झाल्याच्या घटना या रस्त्यावर घडल्या आहेत. शिवाय राञीचा देखील वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन खड्ड्यात जोरात आपटत रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना कंबराचे व मणक्याचे आजार बळावले. पुन्हा एकदा रस्त्याचे काम व्हावे म्हणून या भागातील नागरिकांनी आमदार संतोष दानवे यांच्याकडे व्यथा मांडल्या. त्यानुसार आमदार दानवे यांनी पाठपूरावा करीत रस्ता डांबरीकरणासाठी नऊ कोटी रुपयाचा निधी मंजुर करुन दिला आहे. सदर रस्त्यावर मागील महिनाभरापुर्वी खडी व डांबर टाकून खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु आता डाबरीकरण केव्हा करण्यात येणार असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. सदर रस्ता हा विदर्भ व खान्देशाला जोडल्या जात असल्याने नेहमी या रस्त्यावर वर्दळ असते. यावर्षी सततधार पावसामुळे या रस्त्याची वाट आणखीनच बिकट झाली आहे. त्यामुळे सदर रस्ता राज्यमार्गावरील असल्याने हे काम आता तरी गुणवत्तापूर्वक होणे गरजेचे आहे. रस्त्यावर निधी मंजुर करुन दिला असल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आता पावसाळ्यापूर्वी काम डांबरीकरणाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.
लवकरच कामाला सुरुवात
जुईधरण ते वालसांवगी या रस्त्यावर नऊ कोटी रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. वालसांवगी, पारध, पिंपळगाव रेणुकाई, दानापुर, भायडी आणि जुईधरण फाटा असे हे काम होणार आहे. खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच यावर डांबरीकरण करण्यात येईल. आणि कामात गुणवत्ता राखल्या जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता जी. यु. नागरगोजे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.