आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून १८ डिसेंबरला मतदान व २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच २५ डिसेंबरला ख्रिसमस (नाताळ) सण आहे. शिवाय, महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकाविरुध्द आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, यासाठी येत्या २५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे आदेश सोमवारी जारी केले आहे.
या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तू जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणापत्र किंवा कोणतीही वस्तू बाळगणार नाही. तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.