आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी खासदार स्व. अंकुशरावजी टोपेसाहेब यांनी जालना येथे स्थापन केलेल्या यशवंतराव चव्हाण साहित्यिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा नामांकित राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार या वर्षी कादंबरी वाङ्मय प्रकारासाठी नागपूरचे प्रसिध्द कादंबरीकार रविंद्र शोभणे यांच्या ‘होळी’ या कादंबरीस जाहीर केल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. आ. राजेशभैय्या टोपे यांनी सांगीतले. २५ हजार रुपये व सन्मानपत्र (स्मृतीचिन्ह) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
मराठी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लेखक कलावंताना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या प्रतिष्ठानच्या मार्फत सन २००७ पासून दरवर्षी हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. हेमंत दिवटे, कविता महाजन, त्र्यंबक सपकाळे, प्रभाकर बागल, भारत सासणे, उत्तम कांबळे व अनंता सूर अशा नामाकिंत साहित्यिकांना कविता, कादबरी, कथा, नाटक, समिक्षा, चरित्र, आत्मचरित्र अशा विविध वाड:मय प्रकारासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार निवड व परिक्षणासाठी आजपर्यंत डॉ. भालचंद्र नेमाडे, प्राचार्य रा. रं. बोराडे, डॉ. सिध्दार्थ आगळे, रविंद्र किंबहुणे, डॉ.सुधीर रसाळ, डॉ. सदानंद मोरे, डॉ. शरदकुमार लिंबाळे, प्राचार्य लक्ष्मीकांत तांबोळी, डॉ. दत्ता भगत, डॉ. प्रकाश धांडगे, डॉ.रेवण शाबादे, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, सौ. रेखा बैजल आणि डॉ. सतिश बडवे या महाराष्ट्रातील मराठी सारस्वतांनी काम पाहिले. या वर्षी जाहीर करण्यात येत असलेल्या पुरस्कार निवडीसाठी डॉ. भारत सासणे, डॉ. नागोराव कुंभार व डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी काम पाहिले. लवकरच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन रविंद्र शोभणे यांना हा पुरस्कार दिला जाईल असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सचिव, कार्यवाह व विश्वस्त यांनी कळविले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.