आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिकेची अनास्था:जालन्यातील स्वातंत्र्यवीर जलतरण‎ तलावाला झुडपांचा पडला विळखा‎

जालना‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषदअंतर्गत मोती तलावालगत असलेल्या‎ स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाला काटेरी‎ झुडपांचा विळखा पडला आहे. टप्प्याटप्प्याने तब्बल‎ दीड ते दोन कोटींहून अधिक रुपयांचा खर्च झालेली‎ ही वास्तू केवळ नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे‎ अडगळीत पडून आहे. यामुळे देखभाल-दुरुस्ती‎ करून हा जलतरण तलाव जालनेकरांसाठी पुन्हा‎ सुरू करावा, अशी मागणी जलतरणपटूंकडून केली‎ जात आहे. तसेच अवघ्या ६० किमी अंतरावर‎ असलेल्या छत्रपती संभाजीनगरात मनपा बाराही‎ महिने जलतरण तलाव सुरू ठेवते, मग जालन्यात‎ का नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत‎ आहे.‎ तत्कालीन नगराध्यक्षा भास्कर अंबेकर यांनी‎ पुढाकार घेऊन वर्ष २००६-७ मध्ये जालनेकरांसाठी‎ छत्रपती संभाजी उद्यानाचे सुशोभीकरण केले,‎ जलतरण तलावही बांधला. तब्बल १० ते १२ वर्षे‎ कधी बंद-कधी सुरू अशा पद्धतीने जलतरण तलाव‎ सुरू राहिला, मात्र, ४ जून २०१८ चंदनझिरा भागातील‎ एका शिक्षकाचा पोहताना पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू‎ झाला.

त्या वेळी तलावात जीवरक्षक नाही,‎ पोहणाऱ्यांसाठी कुठल्याही सोयी-सुविधा नाही,‎ प्रशिक्षित जीवरक्षक नेमला असता तर संबंधित‎ शिक्षकाचा जीव वाचला असता असे म्हणत‎ नागरिकांनी पालिकेच्या गलथान कारभारावर तीव्र‎ संताप व्यक्त केला. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस‎ ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही झाली. यापासून‎ धडा घेत जीवरक्षक नेमून जलतरण तलावात‎ अद्ययावत सुविधा देणे अपेक्षित असताना पालिका‎ प्रशासनाने दुर्लक्ष केले ते अाजतागायत कायम आहे.
तलाव चालवता येईना‎
छत्रपती संभाजीनगरात वर्ष २०००‎ मध्ये सर्वसामान्यांसाठी मनपाने‎ सिद्धार्थ जलतरण तलाव उभारला‎ तेव्हापासून आतापर्यंत बाराही महिने‎ हा सुरू आहे. ५० मीटर बाय २१‎ मीटर व १२ मीटर बाय २१ मीटर असे‎ दोन जलतरण तलाव असून ते‎ मनपा स्वत: चालवते.वर्ष २०२२-२३‎ या आर्थिक वर्षात ७६ लाख ८९‎ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न या‎ जलतरण तलावातून मनपाला‎ मिळाले. मात्र, ६० किमी‎ अंतरावरील जालना पालिकेला‎ स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण‎ तलाव चालवता येईना.‎

जलतरण तलावाजवळ जाणेही अवघड
स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव व इमारतीला झाडाझुडपांचा विळखा‎ पडला असून तलावापर्यंत जाणेही अवघड होऊन बसले आहेत. हीच संधी‎ साधून मद्यपींनी या ठिकाणी आपला अड्डा बनवला आहे. शहरातील सर्वच‎ वयोगटातील पोहणाऱ्यांसाठी उभारलेली ही वास्तू धूळ खात पडून आहे.‎

खोली कमी करायचीय‎
सदरील जलतरण तलावाची‎ खोली १४ फुटांपर्यंत असून ती कमी‎ करावयाची आहे. तसेच इतरही‎ कामे करणे आहे. यासंदर्भात‎ आर्थिक तरतूद करून लवकरच‎ जलतरण तलाव सर्वसामान्यांसाठी‎ सुरू करण्याचा मानस आहे.‎ - संतोष खांडेकर, मुख्याधिकारी,‎ न.प.,जालना.‎

पोहणे शक्य नाही‎
सर्वांनाच खासगी जलतरण‎ तलावात पोहणे शक्य नाही. जुना‎ जालन्यातून नवीन जालन्यात ये-जा‎ करण्यासाठी ५ किमी अंतर पडते,‎ यामुळे वेळ व अधिकच्या शुल्काचा‎ भुर्दंड पडतो. सामान्यांसाठी‎ पोहण्याची सुविधाच नसेल तर‎ जलतरणपटू तयार होतील कसे.‎ - अॅड. शैलेश देशमुख, जालना‎

खासगी तलाव सुरू‎
शहरातील नवीन भागात एक, दोन‎ नव्हे तर तीन ठिकाणी खासगी‎ जलतरण तलाव चालवले जातात.‎ मात्र, पालिका एकमेव जलतरण‎ तलावसुद्धा चालवू शकत नाही.‎ खासगीचे शुल्क सर्वांनाच परवडत‎ नाही. यामुळे अनेकांना पोहण्याच्या‎ छंदाला मुरड घालावी लागत आहे.‎ - ईश्वर बिल्होरे, नागरिक, जालना‎

बातम्या आणखी आहेत...