आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक सलोखा:स्त्रियांच्या नावाने बोंब मारण्यास बंदी करणाऱ्या कायद्याला 102  वर्षे पूर्ण

महेश जोशी | छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी केला होता १९२१ मध्ये हा कडक कायदा

होळीला कुणाचे तरी नाव घेत त्या नावाने बोंब मारण्याची जुनी प्रथा आहे. विशेषत: बदलत्या काळात स्त्रियांच्या नावाने बोंब मारण्याची प्रथा पडत गेली. आजही हे प्रकार दिसतात. त्याला एक वर्ग विरोध करताना दिसतो. कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू छत्रपती यांनी मात्र १९२१ मध्येच बाेंब मारण्याच्या या प्रथेविरुद्ध कायदा केला होता. या कायद्यातच उघड्यावर होळी-धुलिवंदनाचे रंग उधळण्यासही मनाई करण्यात आली होती. यंदाच्या होळीला या कायद्याला २१ मार्चला १०२ वर्षे पूर्ण होतील. परंतु शतक उलटून गेले तरी या कायद्याची समाजाला आजही तेवढीच गरज असल्याचे जाणवते.

फाल्गुनी पौर्णिमेला होलिकेचे प्रतिकात्मक दहन करून दुर्गुणांचा नाश व्हावा, अशी प्रार्थना केली जाते. पूजा झाल्यावर वाईट भाषेत स्त्रियांच्या नावाने बोंब मारण्याची परंपरा आहे. इतर वेळी भीती किंवा लाजेखातर आपला राग उघडपणे व्यक्त करता येत नाही म्हणून होळीला अशा शिव्यातून व्यक्त होण्यासाठी ही सूट असल्याचे सांगितले जाई. दुसऱ्या दिवशी धुळवडीलाही ही परंपरा कायम असते. यातून तणाव निर्माण होतो.

होलिकेचे प्रतीकात्मक दहन झाल्यानंतर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्याची परंपरा आजही कायम 100 वर्षे, तरी तंतोतंत लागू राजर्षी शाहू महाराज लोककल्याणकारी राजे होते. त्यांनी केलेल्या महिलांसाठीच्या या कायद्याचा २१ मार्च १९२१च्या करवीर सरकारच्या गॅझेटमध्ये समावेश आहे. डॉ. जयसिंग पवार संपादित "राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' यामध्ये याचा उल्लेख आहे. आजही तो कायदा तंतोतंत लागू ठरतो.

जामीन नाकारावा ^शक्ती कायदा प्रभावी करण्यासाठी शासनाने सूचना मागवल्यावर आम्ही १३ शिफारशी केल्या. यात शिव्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, जामीन मिळू नये यासाठी कायद्यात तरतूद करावी, ही मागणी केली आहे.' -मंगल खिंवसरा, सजग महिला संघर्ष समिती

असा आहे तेव्हाच्या कायद्याचा जाहीरनामा न्याय खाते जाहीरनामा “शिमग्याचे सणात स्त्रियांना उद्देशून निंध व भिमत्स भाषा वापरण्यात येते, ही चाल लाजिरवाणी आहे. हल्लीच्या सामाजिक प्रगतीच्या काळात असा प्रकार चालू देणे इष्ट नाही. करीता सर्व लोकांस कळविण्यात येते की अशी भीमत्स भाषा वापरण्याची चाल आजिबात बंद करावी. यापुढे कोणीही तसली भाषा वापरण्याची नाहीत. तसेच रंगपंचमी दिवशी रंग रस्त्यावर खेळणे हे ही मनाई केले आहे. या हुकूमाविरूद्ध कोणी वर्तणूक केल्यास त्याविरूद्ध कायद्याप्रमाणे काम चालवले जाईल. या हुकुमाचा अमल याच शिमग्याच्या सणापासून होण्याचा आहे, अशी हुजूर आज्ञा झाली आहे. हुु. आज्ञेवरून, बी. जी. देशपांडे(करवीर सरकारचे गॅझेट, भा. १, दि. १९ मार्च १९२१)

बातम्या आणखी आहेत...