आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातून बायपासला जोडणारे दोनच उड्डाणपूल आहेत. त्यावर सातत्याने ट्रॅफिक जाम हाेत असल्याने मनपाकडून रेल्वेस्थानक एमआयडीसी परिसरात आणखी एक उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यावर १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने लवकरच पीएमसीची नियुक्ती केली जाईल. बीड बायपासनंतर आता धुळे-सोलापूर हायवेचे काम झाल्याने शहरातील नागरिकांचा सातारा-देवळाई भागात मालमत्ता घेण्याकडे कल वाढला आहे. परंतु शहर व बीड बायपास परिसराच्या मधून रेल्वे रूळ गेल्याने नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत.
शिवाजीनगर येथील रेल्वेचा भुयारी मार्ग रखडल्याने सध्या नागरिकांना रेल्वेस्टेशन व संग्रामनगर हे दोनच उड्डाणपूल उपलब्ध आहेत. संग्रामनगर उड्डाणपुलालगत असलेल्या मैदानावर मोठा कार्यक्रम असल्यास रेल्वेस्टेशन उड्डाणपूल व शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर वाहतुकीची काेंडी हाेते. त्यात वाहनधारक तासन््तास अडकून पडतात. त्यामुळे रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरात नवा उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी चाचपणी सुरू केली होती. आयटीआयपासून निघणारा विकास आराखड्यातील रस्ता बीड बायपासपर्यंत गेलेला आहे. या रस्त्याचे कामही झालेले आहे. फक्त रेल्वे रुळावरून पूल बांधल्यास नागरिकांना जवळचा मार्ग उपलब्ध होणार असल्याने महापालिकेने पूल उभारण्याचे निश्चित केले.
रेल्वेस्टेशन एमआयडीसीतून जाणार नवीन पूल बीड बायपास परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक रस्ता या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील निर्लेप कंपनीजवळ हा उड्डाणपूल बांधला जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती शहर अभियंता ए. बी. देशमुख यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.