आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाईबाबांच्या पादुकांचे दर्शन मागील १७ वर्षांपासून शहरवासीयांना घडवले जाते. साईंचे जन्मगाव असलेल्या परभणीतील पाथरी येथील श्री साई स्मारक समिती, साईबाबा जन्मस्थान मंदिर, विश्वस्त मंडळ पाथरीच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो. यामध्ये ८० किलोच्या चांदीच्या पालखीत २५ किलोच्या चांदीच्या पादुकांचे दर्शन घडते. चार दिवस शहरातील वास्तव्यात पालखी ७० भाविकांच्या घरी आणि चार मंदिरांत जाते. ज्योतीनगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गिरजाराम हळनोर यांनी पादुकांचे स्वागत केले.
औरंगाबादेत साईबाबांचे अनेक भक्त आहेत. त्यांच्या निमंत्रणावरून १७ वर्षांपूर्वी पालखी पहिल्यांदा शहरात आणली गेली. सागवानाच्या रथातून येणारी पालखी खराब रस्त्यांमुळे रथाशिवाय आणली. पाथरी मंडळाचे विश्वस्त संजय भुसारी म्हणाले, मागील १७ वर्षांपासून पालखी औरंगाबादेत येते. चार दिवसांच्या मुक्कामात एन-९ येथील रेणुकामाता मंदिर, ज्योतीनगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, औरंगपुऱ्यातील बाळकृष्ण महाराज मठ, सातारा परिसरातील साई मंदिर अशा विविध ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी नेली जाते. सोमवारी पालखीचा शेवटचा मुक्काम मनोज शिराढोणकर यांच्या निवासस्थानी होता. या वेळी लघुरुद्राभिषेक करण्यात आला. दशमेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त शिवानंद वाडकर, अशोक येवले, रामेश्वर हुरणे, अमित अभ्यंकर यांनी पादुका पूजन केले. या वेळी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुमित्राताई हाळनोर, दिलीप चव्हाण, मारुती स्वामी, संजय कासलीवाल उपस्थित होते. पादुका पूजन व टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी विठ्ठल मंदिराकडे रवाना झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.