आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन त्यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी मोठी स्थिरता असते. त्यातून अर्थव्यवस्थेलाही गती मिळत असते. मात्र, २००५ च्या नंतरच्या अनेक कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून (राष्ट्रीय पेन्शन योजना) मिळणारी निवृत्ती वेतनाची रक्कम अतिशय तोकडी आहे. म्हणजे निवृत्त होण्यापूर्वी ५० हजार रुपये वेतन असलेल्यांना निवृत्तीनंतर दरमहा पेन्शनपोटी सुमारे फक्त १८९६ रुपये मिळत आहेत. जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीवेळी ३२ हजार रुपये असणाऱ्यांना पेन्शनपोटी २६ हजार रुपये मिळत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यांनी ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’चा नारा दिला आहे. त्यावर इतर राज्यांप्रमाणे तातडीने निर्णय घेतला नाही तर मोठा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
गेल्या आठवड्यात औरंगाबादेत जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एकूणातच पेन्शन योजनेत काय त्रुटी आहेत. त्याचा कर्मचाऱ्यांना नेमका काय त्रास होत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न दिव्य मराठी प्रतिनिधीने केला. तेव्हा असे समोर आले की, प्रचंड वाढत चालेली महागाई हेही त्या मागील एक प्रमुख कारण आहे. कारण आरोग्य सुविधा तसेच गॅस, डाळ, तेल आदी जीवनावश्यक गोष्टींवरील खर्च आवाक्याबाहेर जात आहे. त्यात तुटपुंजी पेन्शन अपुरी पडते. त्यामुळे निवृत्त कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. त्यांची ती अवस्था पाहून २००५नंतर सरकारी नोकर बनलेला प्रत्येक जण अस्वस्थ झाला आहे.
एनपीएसची पद्धत अशी : एकास १९००, दुसऱ्याला २६ हजार पेन्शन कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १०% रक्कम कपात होते. १४ टक्के रक्कम सरकार जमा करते. त्यापैकी ६० टक्के रक्कम निवृत्तीनंतर मिळते. उरलेली ४० टक्के रक्कम रक्कम शेअर मार्केटमध्ये असल्यामुळे कर्मचाऱ्यांना अनिश्चितता वाटते. दोन ते १५,००० रुपयांएवढीच पेन्शन असल्याने नाराजी, रोष आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून एस. एच. गायके म्हणाले, मी २०२० मध्ये निवृत्त झालो. जेमतेम १९०० रुपये पेन्शन आहे. तर २०१२ मध्ये दरमहा ३२ हजार रुपये वेतनावर निवृत्त झालेल्या कैलास सातदिवेंना २६ हजार रुपये पेन्शन मिळत आहे.
एवढी तुटपुंजी पेन्शन कशी पुरणार : एकीकडे महागाई प्रचंड वाढत चालली आहे. दुसरीकडे अनेकांना महिन्याला १८०० रुपयेच पेन्शन मिळते. एवढी तुटपुंजी रक्कम एवढ्या प्रचंड महागाईत कशी पुरणार. सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनी कसे जगावे. - परेश खोसरे, अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना
जुन्या पेन्शनमध्ये या सुविधा सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देवीदास जरारे म्हणाले, जुन्यामध्ये फॅमिली पेन्शनची सुविधा आहे. त्यामुळे सरकारी नोकर मृत पावल्यावर त्याच्या पत्नी, पतीला पेन्शन मिळते. ग्रॅच्युइटी, साडेसोळा महिन्यांचे वेतनही दिले जाते.
नव्या पेन्शन योजनेत हे नाही संघटनेचे मुंबईचे सचिव अविनाश दौड म्हणाले की, जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात जेवढे वेतन मिळते त्याच्या निम्मे वेतन आणि डीए पेन्शनपोटी मिळतो. नव्या एनपीएसमध्ये ही सुविधा नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.