आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरिमंडळातील शहर, ग्रामीण आणि जालना जिल्ह्यातील एकूण ४ लाख ८० हजार ४३९ वीज ग्राहकांनी ६४५.८५ कोटी रुपयांचे वीज बिल थकवल्याने त्यांचे कनेक्शन कायमस्वरूपी कापण्यात आले आहे. दरमहा दंड, व्याज लागून ही रक्कम वाढतच चालली आहे. यामध्ये शहरातील ६९ हजार ५५९ घरगुती, २१ हजार ७१५ व्यावसायिक आणि ३ हजार ३७१ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.
महावितरण विविध कंपन्यांकडून वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवते. मात्र, काही ग्राहक वापरलेल्या विजेच्या बिलाचा भरणाच करत नाहीत. महावितरण त्यांचा शोध घेऊन कनेक्शन कायमस्वरूपी तोडून टाकते. वीज बिल बुडवणाऱ्या सर्व ग्राहकांची अहवालात तशी नोंद केली जाते. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण व जालना अशा परिमंडळातील किती ग्राहकांचे कायमस्वरूपी वीज कनेक्शन कापण्यात आले याबाबत ‘दिव्य मराठी प्रतिनिधी’ने माहिती घेतली असता ४.८० लाखांवर घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांनी वीज बिल भरले नसल्याने त्यांचे कनेक्शन कट करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
वीज बिल भरा, कारवाई टाळा ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलाचा नियमित भरणा करणे आवश्यक आहे. वारंवार सूचना देऊनही काही ग्राहक बिल भरत नाहीत. त्यांच्यावर कायमस्वरूपी कनेक्शन कापण्याची कटू कारवाई केली जाते. त्यामुळे बिलाचा वेळेच्या वेळी भरणा करून कटू कारवाई, व्याज, विलंब शुल्क अशी कारवाई टाळावी. - प्रकाश जमधडे, अधीक्षक अभियंता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.