आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार का, असा रोखठोक सवाल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
अब्दुल सत्तार यांनी काल सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही टीकेच झोड उठवत राजीनाम्याची मागणी केली आहे.
माफी मागितली तरीही...
अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल काल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून त्यांचे कान टोचले. यानंतर सत्तारांनी सॉरी म्हणत विषय संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिल्लोड येथील सभेतही कोणाचे मन दुखावले असल्यासा माफी मागतो म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानावर दगडफेक करत काचा फोडल्या.
आदित्य म्हणाले की...
आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी आक्रमक होत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले सत्तार असे बोलायची ही पहिलीच वेळ नाही. यापू्र्वीही त्यांनी विधाने केली आहेत. टीईटी घोटाळ्यात त्यांचे नाव आले. ओला दुष्काळ कुठे आहे, हे समोर आले नाही. ते शेतकऱ्यांना भेटले नाहीत. बांधावर गेले नाहीत. सुप्रियाताई, महिला खासदारच काय कुठल्याही महिलेला शिवीगाळ करणे हा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार आहे. आता त्यांच्या मनातले लोकांसमोर आले आहे. त्यांचा तातडीने राजीनामा घ्या, अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
सगळे प्रकल्प पळवले
आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला पळवले. एअरबस, वेदांता - फॉक्सकॉन, सॅफ्रॉन असे प्रकल्प पळवण्यात आले. हे प्रकल्प कोणी पळवले हे तुम्हाला माहितीच आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.