आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याचा महिना सुरू आहे. ऑगस्ट. तसे पाहता हे संपूर्ण वर्ष स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे होते. स्वातंत्र्यावरून आठवले. १४ आणि १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री स्वातंत्र्याच्या जल्लोषाची तयारी सुरू होती, तेव्हा मौलाना अबुल कलाम आझाद म्हणत होते की, माझा देश कापला जात आहे. देशाचे तुकडे करणे माझ्या रुंद छातीवर कुऱ्हाड चालवल्यासारखे आहे, असे सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान ओरडत होते. आणि महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या प्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या दिल्लीपासून ११०० किमी अंतरावर कोलकात्याजवळ प्रेतांमध्ये रडत होते. तेव्हा बीबीसीच्या एका वार्ताहराने गांधीजींना विचारले, ‘तुम्हाला जगाला संदेश द्यायचा आहे का?’ गांधीजी उत्तरले- ‘गांधींना इंग्रजी येते हे विसरून जा!’
स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या या उत्तरात असलेली भावना आपण समजू शकलो नाही. इंग्रजांची मानसिकता सोडून द्यावी, असे त्यांचे म्हणणे होते, पण आपण किंवा आपल्या नेत्यांनी तसे काही केले नाही. मात्र, क्रांतीचे दुर्दैव म्हणजे त्याचे जनक मरण पावतात. गांधीजीही आपल्याला अहिंसक क्रांतीतून स्वातंत्र्य देऊन आपल्यात राहिले नाहीत, पण इंग्रजी सोडा, आपल्याला इंग्रजीवादातून सावरता आले नाही आणि त्यामुळे आपण आपल्याच मिथकांच्या व आपल्याच भुसभुशीत जमिनीत रोज गाडले जात राहिलो. अखेर खोटेपणा, ढोंगीपणा आणि अप्रामाणिकपणाच्या जादूने कोणताही वंश, पिढी किंवा राष्ट्र कसे मजबूत होऊ शकते?
पुढे स्वातंत्र्यापूर्वी आपल्यात रुजलेल्या राष्ट्रवादाच्या भावनेशी स्वातंत्र्यानंतर आपले नाते तुटले आणि आपण सुविधाभोगी व भ्रष्ट असल्याचे सिद्ध केले. मग इच्छा असूनही आपण त्यावर मात करू शकलो नाही. असो, हळूहळू पण खात्रीने आपण सावरण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही सावरतोच आहोत. पूर्णपणे सावरणे अजूनही आपल्याला जमलेले नाही, असे दिसते.
मंगळवारी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये अल-कायदाचा कथित प्रमुख जवाहिरीला मारले. आपल्या देशाचे शत्रू, मग तो दाऊद असो वा मसूद, पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत आहेत, पण आपण त्यांचे काहीही करू शकत नाही. आपण वेळोवेळी त्यांना सुपूर्द करण्याची मागणी करतो आणि पुन्हा पुन्हा ते तेथे असल्याचे नाकारले जाते. आपण काहीही करू शकत नाही. किंबहुना प्रचलित रूढी आणि दुर्गुणांमुळे कदाचित आपल्यामध्ये जिद्द, दृढनिश्चय आणि सामना करण्याची क्षमता राहिलेली नसावी!
काय आहेत याची कारणे? काल जी कारणे होती, ती आजही सुप्त रूपात आहेत. ती म्हणजेे दडपशाही, शोषण, सामाजिक-आर्थिक असमानता आणि गैरप्रकार, छळांवर आधारित आपली सत्ता व त्यांच्या सर्व व्यवस्था आहेत. या सत्ता राजकीय असोत, सामाजिक असोत की कौटुंबिक असोत, सर्वांनी त्यांच्या रुढींमुळे नैतिकतेचे काही ना काही नुकसान केले आहे, ते आजही आपणा सर्वांना भोगावे लागत आहे. या वर्षांच्या बेड्या तोडून भावी पिढीला नैतिक, प्रामाणिक आणि कणखर बनवण्याची गरज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून या शुभ कार्याची सुरुवात शुभ ठरेल.
नवनीत गुर्जर नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर navneet@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.