आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळताच गुरुवारी ता. ११ हिंगोलीतही उमेदवारांनी घोषणाबाजी करून तिव्र संताप व्यक्त केला. उमेदवार एकत्र येत असल्याची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावून त्यांची समजूत काढली.
हिंगोली शहरात मागील काही दिवसांपासून अभ्यासिकेत अभ्यासासाठी येणाऱ्या उमेदवारांची संख्या चांगलीच वाढली आहे. येथील पालिकेच्या अभ्यासिकेत हिंगोली शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातूनही उमेदवार स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी येतात. दिवसभरात सुमारे ३०० पेक्षा अधिक उमेदवार येत असून त्यामध्ये पुरुष उमेदवारांसोबतच महिला उमेदवारांचाही समावेश आहे. आता ता. १४ मार्च रोजी परिक्षा असल्याने उमेदवार दिवस रात्र एक करून अभ्यासाला लागले होते.
दरम्यान, नेहमी प्रमाणे आजही उमेदवार अभ्यासिकेत अभ्यासासाठी आले होते. मात्र परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे समजताच उमेदवारांनी तिव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर सुमारे ५० पेक्षा अधिक उमेदवार महात्मा गांधी चौकात एकत्र आले अन घोषणाबाजी सुरु केली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या उमेदवारांना आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर बोलावण्यात आले. त्या ठिकाणी सहाय्यक पोलिस अधिक्षक देशमुख यांनी उमेदवारांशी संवाद साधला. परिक्षा पुढे ढकलण्याचा शासनाचा निर्णय आहे, त्यामुळे उमेदवारांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले. त्यानंतर उमेदवारांचा राग शांत झाला. दरम्यान, शुक्रवारी ता. १२ परिक्षा वेळेतच घ्याव्यात या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.