आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेब्रुवारीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. बैठकांना २० देशांचे अधिकारी, तज्ञ येण्याची शक्यता असून, पाहुण्यांचा मुक्काम असलेल्या ४ पंचतारांकित हॉटेल व पर्यटन स्थळांचे पोलिसांकडून ऑडिट केले आहे. शहर व ग्रामीण पोलिसांनी त्याचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाला सादर केला आहे.
यंदा जी-२० शिखर संमेलनाचे यजमानपद भारत भूषवणार आहे. यात भारताशिवाय अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका या १९ देशांचा समावेश आहे. तर युरोपियन युनियन विसावा सदस्य आहे. दिल्लीत प्रमुख बैठका होत असताना यातील सदस्य देशातील विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यात औरंगाबादचा समावेश असून, प्रामुख्याने महिलांचे शिष्टमंडळ भेट देणार आहे. त्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
बैठकीला येणारे शिष्टमंडळ वेरूळ व अजिंठ्याला भेटी देणार आहे. त्या धर्तीवर पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया यांनी नुकतेच दोन्ही ठिकाणांची पाहणी केली. दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही दुरूस्त करा, सुरक्षाभिंतींची उंची वाढवा, सुरक्षारक्षकांची संख्या वाढवून पर्यटकांचे मार्ग, लेण्या पाहण्याच्या जागा निश्चित करण्याच्या सुचना त्यांनी एएसआय (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग) ला केल्या आहेत.
चार हॉटेलमध्ये बैठका
शहरातील चार बड्या हॉटेलमध्ये या शिष्टमंडळाचा मुक्काम व महत्वाच्या बैठका होतील. त्यामुळे शहर पोलिसांनी चारही हॉटेलचे ऑडिट केले. त्यात प्रामुख्याने फायर ऑडिट, सुरक्षारक्षक, त्यांची उभी राहण्याची जागा, त्यांच्याकडील काम करणाऱ्यांची संख्या व चारित्र्य पडताळणी, संकटकाळातील उपाययोजना आदींचा पाहणी अहवाल तयार केला. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून याची मागणी केली होती. त्यावरुन आम्ही हे ऑडिट केले असून, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तो सादर केल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.