आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैठण तालुक्यातील गोपेवाडी, नायगाव, मायगाव येथे अद्यापही ४०० एकरांत ऊस उभा असल्याचे धक्कादायक वास्तव ‘दिव्य मराठी’ ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील तीन, जालना आणि बीडमधील एका गावातील परिस्थितीचाही आढावा घेतला असता अनेक गावांत शेतातच ऊस उभा असल्याचे दिसून आले. गावातील परिस्थितीचे हे वास्तव सत्य..!
मायगाव : ऊस वाळून गेला, तोडणीचा कालावधी संपला
मायगाव येथे ४०० एकर ऊस होता, आता ५० एकरहून अधिक ऊस शिल्लक आहे. उशिरा ऊस गेल्यामुळे अर्ध्या उसाचे नुकसान झाले. उन्हामुळे उसाचे वजन घटतेय. लागवडीचा खर्च कसा निघणार, असा प्रश्न शेतकरी लहुदास औटे व किशोर दसपुते यांना पडलाय. दोन एकरांवर औटंेनी नोव्हेंबरमध्ये ऊस लावला. आता उसाला तुरे फुटून तो वाळतोय हे सांगताना ते भावुक झाले होते.
गोपेवाडी : लाखांचा खर्च केला, हाती काहीच नाही
गोपेवाडीत २५० एकरांपैकी ५० एकरवर ऊस अद्यापही उभा आहे. २० एकरांवरचा ऊस खराब झालाय. शेतकऱ्यांना शेत पावसाआधी रिकामे करायचे आहे. मात्र आधीच शेतात ऊस उभा असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले असल्याचे शेतकरी शिवाजी गिरजे सांगत होते. उसाचे वजन आधी चांगले होते. आता यात ७५ %ची घट झाली आहे. आता काय भाव मिळणार, असे गिरजे सांगतात.
नायगाव : तोडणीचे पैसे आम्ही देतो, पण ऊस न्या हो!
नायगावातही ऊस उत्पादकांची बिकट अवस्था आहे. गावात ५०० एकरांत उसाची लागवड केली गेली. सध्या १०० एकरांवरील ऊस उभाच आहे. माझ्याच शेतात सध्या पाच एकरांवरील ऊस तोडणी सुरू आहे. १६ महिन्यांपासून तोडणीसाठी मागे लागलो. आत्ता तोडणी मिळाली. तोडणीचे पैसे हवे तर आम्ही देतो; पण कारखान्यांनी ऊस न्यावा, अशी विनंती शेतकरी कांता गिरगे करत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.