आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जिंतूर ते औंढा नागनाथ मार्गावर धारफाटा येथे भरधाव कारचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झाल्याची घटना रविवारी ता. २४ सकाळी दहा वाजता घडली आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. जखमी असलेले सर्व जण औरंगाबाद येथील रामनगर मधील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील चौघे जण त्यांच्या कारने (क्र.एमएच-२०-सीएच-७५८९) आज सकाळी नांदेडकडे जात होते. जिंतूर ते औंढा नागनाथ मार्गावर धारफाट्या जवळ भरधाव कारचे समोरील टायर फुटले. त्यामुळे चालक सारंग बळीराम काळे याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून सुमारे पंचेविस फुट खोल असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात कोसळली. या अपघातात कारमधील रविकांत गोविंद तरटे, पुजा रविंकात तरटे , कमलाकर नागोरे, चालक सारंग बळीराम काळे (सर्व रा. रामनगर औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच धारफाटा येथील गावकरी व औंढा नागनाथ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीराम मोरे, आरोग्य कर्मचारी अश्विनी काटकर, झिरपे यांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. यामध्ये कमलाकर नागोरे वगळता इतरांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या पुजा रविकांत तरटे ह्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात अधिपरिचारीका म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही कामा निमित्त ते नांदेडला जात असतांना हा अपघात झाल्याचेही औंढा नागनाथ पोलिसांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.