आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात एकही महिला पुजारी नाही. शक्तिपीठ देवीचे असूनही देवीला अभिषेक, साडी, मंगळसूत्र घालण्याचे काम पुरुष पुजारी करतात. या ठिकाणी ५० टक्के महिला पुजारी हवेत, अशी मागणी मंदिर विश्वस्तांकडे करण्यात आली आहे. या ठिकाणी महिला पुजारी घेऊन राज्यात आदर्श निर्माण करावा, मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
देसाई या दोन दिवसांपासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्या म्हणाल्या की, महिलांना मासिक पाळी येत असल्याने त्यांना पुजारी म्हणून घेतले जात नाही, असे कारण सांगितले जाते. परंतु, स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे. ही आंदोलनाची भूमिका असून माहूर येथील महिला नगरसेविकांसोबत यासंबंधी चर्चा करण्यात आली. मंदिराच्या विश्वस्तांमध्येही महिलांचा समावेश झाला पाहिजे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. राज्यात अनेक भागांत गरीब कुटुंबातील मुलींचे हुंड्यापायी वेळेत लग्न होत नाही, तर लग्नानंतर अनेकांचे संसार मोडतात. यासाठी युवराज ढमाले कॉर्प आणि भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब, गरजू मुलींच्या लग्नासाठी मदतीचा धनादेश दिला जात आहे. त्याची सुरुवात नांदेडमधून करण्यात आली. सहा मुलींना या ठिकाणी प्रत्येकी १५ हजारांचे धनादेश देण्यात आले. याचा आदर्श शासनाने घेऊन मदत केली पाहिजे, असे देसाई म्हणाल्या. या वेळी नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, भूमाता ब्रिगेडचे कार्यवाह प्रशांत देसाई, स्वाती वटमवार, मगदूम शेख आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.