आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत घरफोड्या करणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ता. २३ अटक केली असून त्यांच्याकडून ४.७४ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी तीन जणांचा शोध सुरु आहे.
हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत हट्टा, वसमत ग्रामीण, आखाडा बाळापूर, कुरुंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरीच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मात्र चोरट्यांचा शोध लागला नव्हता. या प्रकरणात पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सुचना दिल्या होत्या.
त्यावरून पोलिस अधिक्षक कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लकुळे, भगवान आडे, आशिष उंबरकर, विठ्ठल कोळेकर, किशोर सावंत यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाला मिळालेल्या माहितीवरून पाच जण वसमत परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून या पथकाने विलास रमेश शिंदे, राजू उर्फ अन्या महादेव भोसले, गिडप्पा उर्प गिड्या गंगाप्पा भोसले, राजू उर्फ सुन्ना गंगाप्पा भोसले, आकाश बालाजी डोईजड यांना ताब्यात घेतले. त्यांच्या अधिक चौकशीत त्यांनी आठ जणांनी मिळून गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून ४.२४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व एक दुचाकी असा ४.७४ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांना वसमत ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून आणखी तिघांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.