आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील खोकडपुरा परिसरामध्ये मागील तीन महिन्यांपासून ज्या वेळी पाणी येते त्याच वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना टँकर मागवावे लागते. परिसरातील वीज वितरण केबल तीस वर्षे जुनी असल्याने ही समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना फोन करून समस्या सोडवण्याची मागणी केली. तरी दुर्लक्ष केले जात असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर त्रस्त नागरिकांनी महावितरण मुख्यालय गाठत प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, खोकडपुरा परिसरातील डॉ. रोजेकर यांच्या घरापासून तीन गल्ल्यांमध्ये नळाला पाणी आल्यानंतरच लाइट जाते. मनपातर्फे पाच दिवसांनंतर केवळ एक तास पाणीपुरवठा केला जातो. कमी दाबाने पाणी येत असल्याने मोटारी लावणे गरजेचे असते. त्यातही नळाच्या दिवशीच वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी येत नाही.
महावितरणाच्या उदासीन धोरणामुळे मागील तीन महिन्यांपासून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तक्रार केल्यानंतर वायरमन काम करतात. परंतु दुरुस्तीला एक तास लागतो. तोपर्यंत नळाला पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेवटी ३० नागरिकांनी सह्या करुन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना समस्यांचे निवेदन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.