आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प तयार करणार आहे. हा अर्थसंकल्प उत्पन्नावर आधारित असेल. त्यामुळे वर्षभरात पूर्ण होऊ शकणाऱ्या नवीन कामांचेच नियोजन करावे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना महापालिका आयुक्त, प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जी-२० परिषदेच्या तयारीसाठी अधिकारी, कर्मचारी महिनाभर व्यग्र होते. मनपाचा अर्थसंकल्प तयार करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प मार्चअखेरपर्यंत तयार केला जाणार आहे. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सोमवारी प्रशासक डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. मनपा प्रशासक, आयुक्त डॉ. चौधरी यांनी अर्थसंकल्पासाठी घेतलेल्या बैठकीला सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. मनपाचा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प तयार करण्यासाठी विभागप्रमुखांना वर्षभरासाठी लागणारी तरतूद सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
कोणतीही नवीन कामे सुचवताना वर्षभरात ती पूर्ण झाली पाहिजेत, असे नियोजन करण्यात यावे. देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारा निधी कमी पडू नये याची काळजी घेण्यात यावी. उत्पन्नावर आधारित हा अर्थसंकल्प तयार केला जाईल. अपूर्ण कामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जाईल. मार्चअखेरपर्यंत अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, रवींद्र निकम, शहर अभियंता ए. बी. देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
‘जी-२०’मुळे यंदा अर्थसंकल्प लांबला शहराला जी-२० परिषदेंतर्गत महिला-२० परिषद भरवण्याचा मान मिळाला. या परिषदेसाठी सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाची महापालिकेने विविध कामे हाती घेऊन महिनाभरात ती पूर्ण केली. त्यामुळे शहर सुंदर आणि स्वच्छ झाले. मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांनीच ही कामे केली. त्यामुळे महापालिकेची इतर कामे करण्यास वेळ मिळाला नसल्याने अर्थसंकल्पही लांबणीवर पडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.